मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या १७ व्या हंगामातील आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला आता घरच्या मैदानावर खेळण्याचे सुख लाभणार आहे. ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर आज, सोमवारी होणाऱ्या सामन्यात यजमान मुंबईसमोर लयीत असलेल्या राजस्थान रॉयल्सचे आव्हान असेल.
‘आयपीएल’च्या नव्या हंगामाच्या सुरुवातीला सूर गवसण्यासाठी मुंबईच्या संघाला वेळ लागतो असे आजवरचा इतिहास सांगतो. यंदाचा हंगामही याला अपवाद ठरलेला नाही. यंदाच्या हंगामापूर्वी मुंबईने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंडयाची कर्णधारपदी नियुक्ती केली. हा निर्णय मुंबईच्या चाहत्यांना फारसा आवडलेला नाही. त्यातच पहिल्या दोन सामन्यांत हार्दिकला कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करता आली नाही. त्याच्या काही चुकीच्या निर्णयांचा मुंबईला फटका बसला. मुंबईला सलामीच्या लढतीत हार्दिकचा माजी संघ गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने विक्रमी धावसंख्या उभारत मुंबईला पराभूत केले. त्यामुळे मुंबईचा संघ सध्या गुणतालिकेत तळाला आहे. त्यामुळे आता घरच्या मैदानावरील पहिल्याच सामन्यात विजयाचे खाते उघडण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल.
हेही वाचा >>> IPL 2024 DC vs CSK: धोनी तडाख्याची झलक पण मुकेश-खलीलने दिल्लीला तारलं
मुंबईच्या संघाला सुरुवातीच्या काही सामन्यांत तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार यादवविनाच खेळावे लागत आहे. दोन वेगवेगळया दुखापतींतून सावरत असलेल्या सूर्यकुमारला आणखी काही दिवस मैदानाबाहेर राहावे लागणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत अन्य फलंदाजांनी कामगिरी उंचावणे गरजेचे आहे. माजी कर्णधार रोहितने पहिल्या दोनही सामन्यांत चांगली सुरुवात केली. मात्र, त्याच्याकडून मोठया खेळीची मुंबईला आस आहे. त्याला इशान किशननेही साथ देणे गरजेचे आहे. मधल्या फळीत नमन धीर आणि तिलक वर्मा यांना कामगिरीत सातत्य राखावे लागेल. गोलंदाजीत १७ वर्षीय क्वेना मफाकाने गेल्या सामन्यात हैदराबादविरुद्ध पदार्पणात चार षटकांत ६६ धावा दिल्या होत्या. मात्र, या अनुभवातून शिकून तो आगामी सामन्यांत आपला खेळ उंचावेल अशी मुंबईला आशा असेल.
दुसरीकडे, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग दोन विजयांसह केली आहे. राजस्थानचा मुंबईकर सलामीवीर यशस्वी जैस्वालला पहिल्या दोन सामन्यांत फारशी चमक दाखवता आली नाही. मात्र, आता त्याला घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार आहे. गेल्या हंगामात त्याने (६२ चेंडूंत १२४) वानखेडेवर शतक साकारले होते. आता या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा त्याचा मानस असेल.
हार्दिकच्या पुनरागमनाचीच चर्चा
गेल्या दोन ‘आयपीएल’ हंगामांत गुजरात टायटन्सचे यशस्वीरीत्या नेतृत्व केल्यानंतर यंदाच्या हंगामापूर्वी तारांकित अष्टपैलू हार्दिक पंडया पुन्हा मुंबई इंडियन्सकडे परतला. त्यानंतर त्याची मुंबईच्या कर्णधारपदीही निवड झाली. मात्र, मुंबईला पाच ‘आयपीएल’ जेतेपद मिळवून दिलेल्या रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून हार्दिककडे नेतृत्व सोपवल्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अहमदाबाद आणि हैदराबाद येथे झालेल्या यंदाच्या हंगामातील मुंबईच्या पहिल्या दोन सामन्यांत हार्दिकला बऱ्याच शेरेबाजीला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता हार्दिक दोन वर्षांनंतर मुंबईकडून खेळताना वानखेडेवर पुनरागमन करेल, तेव्हा त्याला चाहते पाठिंबा देणार की इथेही शेरेबाजीच होणार, याबाबत गेल्या काही काळापासून चर्चा रंगली आहे. परंतु हार्दिकही भारताचाच खेळाडू आहे हे लक्षात ठेवून चाहत्यांनी शेरेबाजी थांबवावी, असे आवाहन आजी-माजी क्रिकेटपटूंकडून करण्यात येत आहे.
रियानकडून सातत्याची अपेक्षा
राजस्थानसाठी पहिल्या दोन सामन्यांत रियान परागने चमक दाखवली आहे. यंदाच्या हंगामापूर्वी रियानला आपल्यातील प्रतिभेला ‘आयपीएल’मध्ये न्याय देता आला नव्हता. मात्र, या हंगामात राजस्थानने रियानला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्याने या संधीचे सोने केले. त्याने पहिल्या सामन्यात लखनऊविरुद्ध २९ चेंडूंत ४३ धावांची, तर दुसऱ्या सामन्यात दिल्लीविरुद्ध ४५ चेंडूंत नाबाद ८४ धावांची खेळी साकारली. आता राजस्थानला त्याच्याकडून सातत्याची अपेक्षा असेल. कर्णधार संजू सॅमसननेही पहिल्या सामन्यात अर्धशतक साकारले होते. मात्र, जोस बटलर कामगिरी उंचावेल अशी राजस्थानला आशा असेल. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, संदीप शर्मा आणि नांद्रे बर्गर असा ताफा राजस्थानकडे उपलब्ध आहे. * वेळ : सायं. ७.३० वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा