Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings IPL Final: रविवारी झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्जनं विजेतेपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सला पराभूत करत झोकात अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे पंजाबलाच पराभूत करत आरसीबी पहिल्याच क्वालिफायरमधून अंतिम फेरीत दाखल झाली आहे. पण या दोन्ही संघांमधलं सर्वात महत्त्वाचं आणि दोन्ही संघांसाठी प्रचंड जिव्हारी लागणारं साम्य म्हणजे आजतागायत आयपीएलच्या एकाही सीझनचं विजेतेपद या संघांना पटकावता आलेलं नाही. त्यामुळे मंगळवारी ३ जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ सारख्याच जिद्दीनं खेळताना दिसतील!

कशी आहे दोन्ही संघांची कामगिरी?

आयपीएलच्या आजपर्यंत झालेल्या १७ पर्वांमध्ये एकाही पर्वात RCB किंवा PBKS यांना विजेतेपद पटकावता आलेलं नाही. एकीकडे आरसीबी अनेकदा प्लऑफ आणि काही वेळा तर अंतिम फेरीत पोहोचूनही त्यांना विजेतेपद मिळवता आलेलं नाही. दुसरीकडे पंजाब किंग्ज फक्त एकदाच अंतिम फेरीत पोहोचलेलं आहे. अगदी गेल्या पर्वात २०२४ मध्ये पंजाब थेट नवव्या स्थानी होतं तर त्याआधी २०२३ मध्ये आठव्या स्थानी. त्यामुळे पंजाबसाठी अंतिम फेरी ही मोठी झेप ठरली असून आरसीबीसाठी पुन्हा एकदा काठावरचा संघर्ष ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दोन्ही संघांची IPL मधील वर्षनिहाय कामगिरी…

वर्षRCBPBKS
२००८सातवे स्थानक्वालिफायर
२००९उपविजेतेपाचवे स्थान
२०१०क्वालिफायरआठवे स्थान
२०११उपविजेतेपाचवे स्थान
२०१२पाचवे स्थानसहावे स्थान
२०१३पाचवे स्थानसहावे स्थान
२०१४सातवे स्थानउपविजेते
२०१५क्वालिफायरआठवे स्थान
२०१६उपविजेतेआठवे स्थान
२०१७आठवे स्थानपाचवे स्थान
२०१८सहावे स्थानसातवे स्थान
२०१९आठवे स्थानसहावे स्थान
२०२०चौथे स्थानसहावे स्थान
२०२१क्वालिफायरसहावे स्थान
२०२२चौथे स्थानसहावे स्थान
२०२३सहावे स्थानआठवे स्थान
२०२४चौथे स्थाननववे स्थान
२०२५अंतिम फेरीअंतिम फेरी

२०२५ च्या पर्वाचा विचार करता साखळी सामन्यांमध्ये PBKS नं १४ पैकी ९ सामने जिंकले असून ४ सामन्यांमध्ये पंजाबला पराभूत झालं आहे. एक सामना अनिर्णित ठरला. साखळी सामन्यांत पंजाबच्या नावावर १९ गुण होते. त्यांच्याच खालोखाल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघ राहिला. १० सामन्यांमध्ये बंगळुरूनंही ९ सामन्यात विजय तर ४ सामन्यांत पराभव आणि एक सामना अनिर्णित अशी कामगिरी केली असून आरसीबीकडेही १९ गुण होते.

प्लेऑफमध्ये RCB वरचढ, PBKS ची पडझड!

दरम्यान, साखळी सामन्यांमध्ये तुल्यबळ राहिलेल्या या संघांमध्ये प्लेऑफमध्ये झालेल्या लढतीत मात्र आरसीबीच वरचढ राहिली. कमी धावसंख्येच्या या सामन्यात आरसीबीनं पंजाबचा पराभव करत थेट अंतिम फेरीत धडक मारली. मात्र पराभूत झाल्यामुळे पंजाबला मुंबई इंडियन्सशी क्वालिफायर सामना खेळावा लागला. या सामन्यात मात्र पंजाबनं मुंबई इंडियन्सचा दणदणीत पराभव करत अंतिम फेरी धडक मारली.

काय झालं क्वालिफायर सामन्यात?

मुंबई इंडियन्सनं जॉनी बेअरस्टो (३८), तिलक वर्मा (४४) आणि सूर्यकुमार यादव (४४) यांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर PBKS समोर IPL Final मध्ये जाण्यासाठी तब्बल २०४ धावांचं आव्हान ठेवलं. तेव्हा किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी हे आव्हान कठीण ठरेल असं सगळ्यांनाच वाटलं होतं. कारण मुंबई इंडियन्स आजतागायत २०० धावा केल्यानंतर पराभूत झालेली नव्हती. पण रविवारी किंग्ज इलेव्हननं कर्णधार श्रेयस अय्यरच्या तुफानी खेळीच्या जोरावर हेही करून दाखवलं!

रविवारी झालेल्या क्वालिफायरमध्ये श्रेयस अय्यरनं ४१ चेंडूंत ८७ धावा कुटल्या. यात ५ चौकार आणि तब्बल ८ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. श्रेयस अय्यरसह जॉश इंग्लिस (३८) आणि नेहाल वढेरा (४८) यांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची अक्षरश: पिसं काढली. २०४ धावांचं आव्हान पंजाबनं एक षटक राखून फक्त ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहला एकही विकेट मिळाली नाही. उलट त्याच्या ४ षटकांमध्ये पंजाबनं तब्बल ४० धावा कुटल्या!