Sharad Ponkshe : विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या राज्यात सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात प्रचारसभा पार पडली. या सभेत बोलताना अभिनेते शरद पोंक्षे यांनी भाषण करत राज्याच्या राजकारणावर भाष्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह २०१९ नंतर राज्याच्या राजकारणात घडलेल्या सर्व घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी मनसेच्या व्यासपीठावरून बोलताना मी शिंदे गटाचा उपनेता फक्त नावाला आहे, असं म्हणत शरद पोंक्षे यांनी शिवसेना शिंदे गटावर अप्रत्यक्ष टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पोंक्षे काय म्हणाले?

“कुठलीही निवडणूक कोणालातरी हरवण्यासाठी कधीच लढायची नसते, तर जिंकण्यासाठी लढायची असते. कोणाची रेषा पुसून स्वत:ची रेषा मोठी करायची नसते. स्वत:ची रेषा स्वत: काढायची असते. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही पक्षात गेले नाहीत किंवा लगेच घाईघाईने पक्षही काढला नाही. त्यांनी खूप वेळ घेतला, महाराष्ट्रभर फिरले. शिवसेनेतला त्यांचा अनुभव आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर वावरलेला हा मुलगा खऱ्या अर्थाने पुरोगामी म्हणावे असे त्यांचे हिंदुत्वाचे संस्कार. अशा या मुलाने शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर खूप वेळ घेतला आणि मग स्वत:चा पक्ष स्थापन केला. राज्यात मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणं आणि देशाचा प्रश्न आला तर हिंदुंच्या हक्कासाठी लढणं. त्या विचारसरणीवर मनसेचा जन्म झाला”, असं शरद पोंक्षे यांनी म्हटलं.

हेही वाचा : “काकांनी डोळे वटारले अन् लगेच…!” सकाळच्या शपथविधीवरून राज ठाकरेंचा अजित पवारांना चिमटा

“१८ वर्ष एक माणूस एका वेगळ्या विचाराने धडपडतोय. महाराष्ट्राच भलं व्हावं, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र मला निर्माण करायचा आहे. हे मी सातत्याने त्यांच्या तोंडून ऐकत आलोय. ते स्वप्न साकार करण्याची आता वेळ आली आहे. राज ठाकरे हे रोखठोक व्यक्तीमत्व आहेत. मनात एक आणि ओठावर एक अशी भानगड त्यांच्याकडे नाही. त्यामुळे मला वाटलं की या निवडणुकीत काही सभा राज ठाकरे यांच्यासाठी घ्याव्यात आणि मी स्वत:हून त्यांना फोन केला. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत एका संमेलनामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी राज ठाकरे यांची मुलाखत होती. तेव्हा भेट झाली, तेव्हा आमच्यात दुसरी कोणतीही चर्चा झाली नाही. ते अमेरिकेत होते, पण मनाने महाराष्ट्रात होते”, असं शरद पोंक्षे यांनी म्हटलं.

“महाराष्ट्रातील या अशा प्रकारच्या राजकारणाला आम्ही देखील कंटाळलो आहोत. कुणाला मत द्यायचं हा प्रश्न आहे. अ, ब, क, ड, ई, फ, असे पक्ष झालेत. अ आणि ब वर्षांनुवर्ष एकाच विचारसरणीचे आहेत म्हणून ते मित्र. क आणि ड यांची एक विचारसरणी आहे म्हणून ते मित्र. पण क आणि ड आम्हाला महाराष्ट्रात कधीच नको म्हणून आम्ही सर्वांनी अ आणि ब ला निवडून दिलं. पण अचानक ब उठला आणि क आणि ड बरोबर जाऊन बसला. मग ब-क-ड असं एक त्रांगडं बनलं. मग त्यातील ड उठला आणि पुन्हा अ बरोबर आला. तो ड असा म्हणाला की तो क मला आवडत नाही. तो चुकीचा आहे म्हणून मी इकडं आलो, आरे या राज्यात काय लावलंय?”, असं म्हणत शरद पोंक्षे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करत महाविकास आघाडी आणि महायुतीवर हल्लाबोल केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sharad ponkshe criticized cm eknath shinde shiv sena in mns public meeting thane i am the deputy leader of the shinde group only in name gkt