Former Maharashtra CM Ashok Chavan Resigned from Congress : ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा (विधानसभा सदस्यत्व) राजीनामा दिला आहे. दरम्यान, अशोक चव्हाण आता भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपा त्यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा सध्या रंगतेय. या सर्व प्रकारच्या चर्चांवर स्वतः अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशोक चव्हाण यांनी नुकतीच मुंबईत प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, मी विधानसभा अध्यक्षांना भेटून काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर प्रदेशाध्यक्षांना काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये असताना नेहमीच प्रामाणिकपणे काम केलं. मला कोणाबद्दल कसलीही तक्रार करायची नाही, राजीनामा देण्यामागे कुठलीही व्यक्तीगत भावना नाही. माझी पुढची राजकीय दिशा काय असेल याबाबत निवेदन निश्चित करेन. एक ते दोन दिवसांत तुम्हाला सर्वकाही सांगेन.

दरम्यान, यावेळी चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आले की, तुम्ही भाजपात जाणार का? भाजपा तुम्हाला राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, त्यात किती तथ्य आहे? यावर अशोक चव्हाण म्हणाले, मला भाजपाची कार्यप्रणाली माहिती नाही. भाजपात जाण्याचा मी अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मी मघाशी सांगितल्याप्रमाणे येत्या दोन दिवसांत माझी भूमिका स्पष्ट करेन.

काँग्रेस सोडण्याबाबत प्रश्न विचारल्यावर अशोक चव्हाण म्हणाले, “प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे असं नाही. मी जन्मापासून काँग्रेसचं काम केलं आहे, आता मला वाटलं अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून राजीनामा दिला आहे.” पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चेवर प्रश्न विचारल्यावर अशोक चव्हाण म्हणाले, मला कोणतीही पक्षांतर्गत गोष्ट जाहीर करायची नाही, किवा उणीदुनी सांगायची नाहीत. कोणत्याही काँग्रेसच्या आमदाराशी माझं काही बोलणं झालेलं नाही. काँग्रेस सोडणं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी मंत्री असताना भाजपासहित सर्व पक्षांच्या आमदारांना निधी दिला आहे. मी कधीही भेदभाव केला नाही.

हे ही वाचा >> अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडली? जुन्या सहकाऱ्याने सांगितलं कारण; या मोठ्या नेत्यावर फोडलं खापर

दरम्यान, भाजपा नेते आणि भाजपाच्या महाराष्ट्र ओबीसी मोर्चाचे प्रमुख आशिष देशमुख यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आशिष देशमुख हे आधी काँग्रेसचे नेते होते. परंतु, काही महिन्यांपूर्वी काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण यांचे जुने सहकारी असलेले आशिष देशमुख म्हणाले, काँग्रेसकडे जोवर नाना पटोले यांच्यासारखा प्रदेशाध्यक्ष आहे तोवर तिकडे अशीच परिस्थिती असेल. त्यांच्या कारभाराला कंटाळून, त्रस्त होऊन काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते हे लवकच काँग्रेसला सोडचिट्ठी देताना पाहायला मिळतील. शेवटी नाना पटोलेंच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात काँग्रेस ही नामशेष झालेली पाहायला मिळेल. आगामी काळात नक्कीच अनेक काँग्रेस नेते पक्ष सोडून जातील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan says not decided yet to join bjp after resign from congress mla asc