Chhagan Bhujbal On Ajit Pawar : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक मोठ्या नेत्यांना स्थान देण्यात आलेलं नाही. काही नेत्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळे काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना देखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून देखील दाखवली आहे. एवढंच नाही तर छगन भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्य़ांशी संवाद साधत पुढील भूमिकेबाबत चर्चा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, आज राज्यातील ओबीसी नेत्यांबरोबर छगन भुजबळ यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना काही सवाल केले आहेत. तसेच मग मला निवडणूक लढायला सांगायचं नव्हतं ना?, असं म्हणत छगन भुजबळ यांनी थेट अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

हेही वाचा : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”

छगन भुजबळ काय म्हणाले?

पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांना तुमची पुढची भूमिका काय असेल? असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, “मला माझी भूमिका घ्यायला आणखी वेळ लागेल. त्यासाठीच मी सर्वांशी चर्चा करत आहे”, असं त्यांनी म्हटलं. यावेळी काही वरिष्ठांना मंत्रिपद दिलं नाही, कारण तरुणांना मंत्रिमंडळात संधी द्यायची असते, या अजित पवारांच्या विधानासंदर्भात प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले, “तरुणांना मंत्रिमंडळात संधी द्यायची ही चांगली गोष्ट आहे. मात्र, तरुणांना संधी द्यायची यासाठी व्याख्या ठरवली गेली पाहिजे. त्यामध्ये किती वर्षांपर्यंत तरुण म्हणायचं? मग ६७ ते ६८ वर्षांपर्यंतही तरुण म्हणायचं का? हे ठरवलं पाहिजे”, असा टोला छगन भुजबळ यांनी अजित पवारांना नाव न घेता लगावला.

भुजबळ पुढे म्हणाले, “मला अगोदर सांगितलं असतं की तुम्ही निवडणुकीत उभं राहू नका, मी राहिलो नसतो. पाच महिन्यांपूर्वी मला लोकसभेत पाठवत होते, तेव्हा माझी संपूर्ण तयारी झाली. मात्र, तेव्हाही मला थांबवावं लागलं. त्यानंतर राज्यसभेची निवडणूक आली तेव्हा म्हटलं मला राज्यसभेवर पाठवा. तेव्हा मला म्हणाले की, तुमची गरज राज्यात जास्त आहे. मग आता माझी गरज कमी झाली का? असं होतं तर मला निवडणूक लढवायला सांगायचं नव्हतं ना? आज माझ्या मतदारसंघात एक वेगळं वातावरण निर्माण झालं ते झालं नसतं. आता सर्व झाल्यानंतर मला सांगतात की राज्यसभेवर जा. मी आता राज्यसभेत जायचं याचा अर्थ मी विधानसभेचा राजीनामा द्यायचा. मग मी राजीनामा कसा देऊ?”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

ओबीसींच्या बैठकीत काय ठरलं?

ओबीसींच्या बैठकीबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, “आज ओबीसी नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर मला त्यांनी सांगितलं की असं कसं होऊ शकतं? तुम्ही राज्याचं ओबीसींचं नेतृत्व करता. ओबीसींच्या प्रश्नांसाठी तुम्ही राज्यात आणि विधानसभेत प्रश्न मांडले. आता तुम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं, याचा अर्थ यामागे काहीतरी गौडबंगाल आहे. कारण तुम्ही नेहमीच ओबीसींच्या मुद्यांची पाठराखण केली. त्यामुळे आम्हाला भिती वाटते की हे वेगळं काहीतरी आहे. त्यामुळे आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आता पुढे काय करायचं? ते आपण बसवून ठरवा. असं ओबीसी नेत्यांनी सांगितलं”, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal on ajit pawar baramati speech mahayuti cabinet expansion ncp politics assembly election 2024 gkt