Varsha Gaikwad : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सैफ अली खान त्याच्या घरी असताना घरात अचानक एक अज्ञात व्यक्ती शिरला आणि त्याने सैफ अली खानवर चाकू हल्ला केला. या घटनेत सैफ अली खानला सहा जखमा झाल्या. त्यानंतर सैफ अली खानला तातडीने वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तसेच शस्त्रक्रिया करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, या घटनेबाबत आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. आता काँग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी या घटनेवरून मुंबईसह संपूर्ण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच ‘मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. तसेच महाराष्ट्रात जे घडतंय ते धक्कादायक आहे’, असं म्हणत खासदार वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

“बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्याचं वृत्त सकाळी समोर आलं. खरं तर मुंबईमध्ये अशा प्रकारची घटना घडणं हे दुर्देवी आहे. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचं हे उदाहरण आहे. कारण अभिनेता सैफ अली खानच्या घरावर हल्ला झाला. त्याआधी वांद्रे परिसरात तीन मोठे हल्ले झाल्याच्या घटना घडल्या होत्या. काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दिकी यांच्या ऑफिसच्या बाहेर त्यांच्यावर हल्ला झाला, दुर्दैवाने त्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर हल्ला झाला. सलमान खानच्या घरावर बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता सैफ अली खानच्या घरात घूसून हल्ला झाला”, असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

“सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी जास्त लोकांचा वावर आहे, त्या परिसरात अशा प्रकारच्या घटना घडायला लागल्या आहेत. कारण सध्या पोलिसांचं मानसिक खच्चीकरण केलं जात आहे. पोलिसांच्या आम्ही तुमच्या बदल्या करू, अशा प्रकारची विधाने केली जातात. आज गृहविभागावर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मात्र, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना यावर उत्तर द्यावं लागेल. कारण महाराष्ट्रातील परभणी आणि बीड जिल्ह्यातील घटना, तसेच पुण्यातील कोयता हल्ल्याच्या घटना किंवा आता मुंबईत तीन चार घटना ज्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या घडल्या आहेत. यावर आता गृहमंत्री फडणवीसांना उत्तर द्यावं लागेल. कारण ज्या व्यक्तींना पोलीस संरक्षण आहे, तसेच स्वत:ची सुरक्षेची व्यवस्था आहे. पण तरीही अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे सर्वसामान्य माणसांवर काय परिणाम होतील? सुरक्षा असलेली लोक सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसांचं काय?”, असे अनेक सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mp varsha gaikwad on bollywood actor saif ali khan attack in mumbai and mumbai police gkt