रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील भोगाव पुलावर गुरुवार, ११ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या मारुती इको गाडी उलटून भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली इको कार संरक्षक भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लिंगप्पा कट्टप्पा पातारे (वय २९, रा. आदर्शनगर कॉलनी नं. २, दिघी, पुणे) हा आपल्या ताब्यातील इको कार (एमएच-१४ केएस-०२३१) घेऊन मुंबई ते गोव्याच्या दिशेने जात होता. मात्र, भोगाव पुलावर पोहोचताच त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डाव्या बाजूच्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळली. या अपघातात अनिल देविदास कांबळे (वय ५५) रा. घरवली, ता. हवेली, जि. पुणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक लिंगप्पा पातारे, नागेश मलके कांबळे (वय ३७) रा. चरवली, ता. हवेली, जि. पुणे आणि विकास शंकर चव्हाण (वय १८) रा. चरवली, ता. हवेली, जि. पुणे हे तिघे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस विभाग, कशेडी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. मृतदेह व जखमींना रुग्णवाहीकेतून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.