अलिबाग: राज्यातील मत्स्योत्पादनात २९ हजार १८४ टन वाढ झाली आहे. सन २०२३-२४ मध्ये राज्याचे ४ लाख ३४ हजार ५७५ टन होते, २०२४-२५ मध्ये ते वाढून ४ लाख ६३ हजार ७५८ टनवर पोहोचले आहे. गेल्या मासेमारी हंगामात मत्सोत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले होती. मात्र हंगामात मत्सोत्पादनात पुन्हा वाढ झाल्याने मत्स्यव्यवसायायिकांना दिलासा मिळाला.

गेल्या सहा वर्षात पहिल्यांदाच सर्वाधिक मत्स्योत्पादनाची नोंद या वर्षी झाली आहे. परप्रांतीय मासेमारी बोटींना राज्याच्या सागरी हद्दीत होणारी घुसखोरी रोखण्यात आलेले यश, पर्ससीन आणि एलईडी मासेमारी रोखण्यात यश आणि हवामानाने दिलेली साथ मच्छीमारांच्या पथ्यावर पडली आहे. राज्यातील मत्स्य उत्पादन वाढीचे प्रमाण ६.२९ टक्के आहे.

महत्वाची बाब म्हणजे कोकण किनारपट्टीवरील इतर जिल्ह्याच्या तुलनेत कोकणातील मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. २०२३-३४ मध्ये ठाणे जिल्ह्यात २६ हजार ०५७ टन उत्पादन नोंदवले गेले होते. त्या तुलनेत २०२४-२५ मध्ये ठाण्यात ५४ हजार ४५७ टन मत्स्य उत्पादन झाले आहे.तर पालघर, मुंबई उपनगर, बृहमुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मत्स्योत्पादन साधारणपणे मागील हंगामाच्या तुलनेत १ ते २ हजार मेट्रीक टनची वाढ झाली आहे.

गेल्या काही वर्षात राज्यातील मच्छीमारांना विवीध प्रकाराच्या आव्हानांना तोंड द्यावे लागले होते. करोना काळातील टाळेबंदीमुळे मत्स्य व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यानंतर निसर्ग आणि तौक्ते वादळांचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसला होता. गेल्या हंगामातली हवामानातील बदलांचा फटका मासेमारी बसलो होता. मात्र यावर्षीचा हंगात हवामानाची साथ मिळाल्याने मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला.

जिल्हा निहाय मत्स्योत्पादन

जिल्हा मत्स्य उत्पादन

पालघर ३१ हजार १८१ टन

ठाणे ५४ हजार ४५७ टन

मुंबई उपनगर ७५ हजार २५४ टन

बृहंमुंबई १ लाख ७३ हजार ०९१ टन

रायगड ३५ हजार ०२७ टन

रत्नागिरी ७१ हजार ३०३ टन

सिंधुदुर्ग २३ हजार ४४५ टन