परभणी : जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामध्ये ५२ महसूल मंडळे प्रभावित झाली असून, जिल्ह्यातील नुकसानग्रस्त ९ तालुके व सर्वच मंडळांमध्ये मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व तांत्रिक निकष बाजूला सारून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर केली आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आज बुधवारी (दि. ८) घेतलेल्या पत्रकार बैठकीत केले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज हे आजवरचे सर्वांत मोठे पॅकेज असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्र्यांनी आज शासन निर्णयानंतर घेतलेल्या पत्रकार बैठकीत माहिती दिली. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, डॉ. केदार खटींग, प्रेरणा वरपुडकर, बाळासाहेब जाधव, विलास बाबर, सचिन अंबिलवादे, मोहन कुलकर्णी, मंगल मुदगलकर, एन.डी. देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थित होती. शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी १८ हजार ५०० रुपये, हंगामी बागायतीसाठी २७ हजार रुपये तर बागायतीसाठी प्रति हेक्टरी ३२ हजार ५०० रुपये मदत दिली जाणार आहे. एकही अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे त्या म्हणाल्या. अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतकऱ्यांसह पिके, जनावरे, गोठे, दुकाने, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही जणांचे मृत्यूही झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत दौरे केले. काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्तांना तातडीची १० हजार रुपयांची मदत, गहू, तांदूळ आदी मदतही दिली. यासाठी २२०० कोटी रुपयांचा पहिला हप्ता तातडीने मंजूर करण्यात आला, असेही पालकमंत्री बोर्डीकर यांनी निदर्शनास आणून दिले.

विमाधारक शेतकऱ्यांना लवकर मदत मिळवून देण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मुख्यमंत्री फडणवीस हे पाठपुरावा करीत आहेत. विमाधारकांव्यतिरिक्त इतर शेतकरी यांनाही १७ हजार रुपये प्रति हेक्टरी इतकी रक्कम दिली जाणार आहे. या भरपाईसाठी १८ हजार कोटींहून अधिकची तरतूद केली जाणार असल्याचेही यावेळी बोर्डीकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामधील अतिवृष्टीबाबत १२८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य यापूर्वीच वितरित केले आहे. सर्व निकष बाजूला ठेवून ही मदत देण्यात आली आहे. आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच अतिवृष्टीमुळे विहिरीत गाळ साचलेल्या शेतकऱ्यांस ३० हजार रुपयांचे अनुदान मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. या व्यतिरिक्त पीक कर्ज वसुली स्थगिती, वीज बिल वसुलीमध्ये स्थगिती वगैरेंचेही निर्णय घेतले आहेत, हे ही निदर्शनास आणून दिले. या जिल्ह्यात अतिवृष्टीने पूल, रस्ते यासह अन्य इमारतींचे अतोनात असे नुकसान झाले आहे, हे ही पालकमंत्री बोर्डीकर यांनी नमूद केले. आतापर्यंत अतिवृष्टीत नुकसान झालेल्या सर्व आपदग्रस्तांना मदतीचा हात दिला जाईल, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.