महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूरमधील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. देशमुख कुटुंबियांकडून विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी तरुण नेते, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदमदेखील उपस्थित होते. विश्वजीत कदम यांचे वडील, काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम आणि विलासराव देशमुख यांची विधानसभेतील कारकिर्द एकाचवेळेस सुरू झाली होती. दोन्ही नेत्यांमध्ये घट्ट मैत्री होती, अशी आठवण विश्वजीत कदम यांनी करून दिली. तसेच विलासराव देशमुख हयात असते तर काँग्रेस पक्षाला फोडण्याची कुणाचीही हिंमत झाली नसती, असेही कदम यांनी सांगितले. अशोक चव्हाण आणि इतर नेते काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर विश्वजीत कदम यांनी हे वक्तव्य केल्याचे बोलले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“काँग्रेस आमच्या रक्तात! ही विलासरावांची शिकवण, मी जिथे..”, पक्ष सोडण्याच्या चर्चांवर अमित देशमुख यांनी थेटच सांगितलं

तर काँग्रेसची आजही सत्ता असती

विश्वजीत कदम म्हणाले, “विलासरावांचा हसता-खेळता स्वभाव सर्वांना आठवत असेल. त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे आजही सोशल मीडियावर शेअर केली जातात. त्यातून काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते. जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्ष अडचणीत येतो. तेव्हा स्व. विलासराव देशमुख यांची आठवण येते. विलासराव देशमुख आज हयात असते तर महाराष्ट्रातून काँग्रेसची सत्ता कधी गेली नसती. आजही विलासराव देशमुख असते काँग्रेस पक्ष फोडण्याची किंवा कुटुंब फोडण्याची कुणाचीही हिंमत झाली नसती.”

राजकारणाची पातळी घसरली; विलासरावांची आठवण सांगतांना रितेश देशमुख म्हणाले, “काका-पुतण्याचे प्रेम…”

अमित देशमुखांनी नेतृत्व करावे

“१९९९ साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमधून वेगळा झाला. त्यानंतर विलासराव देशमुख यांनी खंबीरपणे काँग्रेसची धुरा सांभाळली. त्याप्रमाणे अमित देशमुख यांनी आता नेतृत्वाची धुरा सांभाळावी मी, बंटी पाटील आणि इतर तरूण आमदार तुमच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत, अशी ग्वाही विश्वजीत कदम यांनी दिली. राजकारणात रोज वावड्या उठवल्या जातात की, आमच्यापैकी कुणी पक्ष सोडणार आहे. पण यामागे मोठे राजकारण आहे. लोकांनी त्याकडे लक्ष देऊ नये. आम्ही काँग्रेसचे तरूण नेते सर्व एकसंघ आहोत”, असेही विश्वजीत कदम म्हणाले.

विश्वजीत कदम पुढे म्हणाले की, विलासराव देशमुख यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारचे नेतृत्व यशस्वीरित्या केल्यानंतर काँग्रेसची एक मोठी ताकद राज्यात निर्माण झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नेत्यांनी विलासरावांना पाठिंबा दिला. विलासरावांनी त्या काळात एक अतिशय उत्तम टीम आपल्या कॅबिनेटमध्ये घेतली होती. पुढील १५ वर्ष राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली, असे दूरदर्शी राजकारण त्यांनी केले.

“ते दिवस पुन्हा आणायचे असतील तर…” अमित देशमुखांचे विधान, शरद पवारांचे नाव घेत म्हणाले, “प्रत्येक…”

माझ्या भावाच्या मृत्यूनंतर विलासरावांनी वडिलांना सावरलं

विश्वजीत कदम यांनी एक भावूक आठवणही यावेळी सांगितली. ते म्हणाले, १९९९ साली माझे बंधू अभिजीत कदम यांचे दुःखद निधन झाले. त्यावेळी माझ्या वडिलांना सावरण्याचे काम विलासराव देशमुखांनी केले. मुख्यमंत्री असूनही विलासराव तीनवेळा माझ्या वडीलांची भेट घेण्यासाठी आले होते. एकदा तर त्यांनी बंद खोलीत तासभर वडिलांशी संवाद साधला आणि त्यांची समजूत घातली. मुलाचं अकाली निधन झाल्यानंतर वडिलांना दुःखाच्या अंधारातून बाहेर काढण्याचं काम विलासरावांनी केलं. माझ्या वडिलांनी स्थापन केलेल्या भारती विद्यापीठाच्या प्रत्येक वास्तूमध्ये आणि नव्या उपक्रमाला विलासराव देशमुख यांचा स्पर्श लाभलेला आहे. आमचा कोणताही कार्यक्रम त्यांनी कधी डावलला नाही, असेही विश्वजीत कदम यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If vilasrao deshmukh live then nobody dared to break the congress says congress mla vishwajeet kadam kvg