अलिबाग: मातृत्वाला काळीमा फासणारी घटना रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील किहीम येथे समोर आली आहे. विवाहबाह्य प्रेमसंबधांला अडसर ठरणाऱ्या पोटच्या चिमुकल्यांची आईनेच गळा दाबून हत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्थानिक गुन्हे शाखेने सदर महिलेला चिमुकल्यांच्या हत्त्येप्रकरणी अटक केली आहे. शितल पोले असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी सायंकाळी पावणे आठ वाजता आराध्या पोळे (वय ५) आणि सार्थक पोळे (वय ३) या दोन मुलांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बाब समोर आले होती. दोन्ही मुलांना बेशुध्द अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा पोलीसांनी दोघांनाही मृत घोषित केले होते. दोन्ही मुलांच्या संशयास्पद मृत्यू नंतर पोलीसांनी दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे रुग्णालयात पाठवले होते. या प्रकरणी मांडवा पोलीसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. मांडवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी या घटनेबाबतची माहिती पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांना दिली होती. यानंतर घटनेची गंभीर दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते.

हेही वाचा : मोदींना साथ देण्यासाठी राज ठाकरे यांनी महायुतीसोबत यावे – बावनकुळे

दोन्ही मुलांच्या मृत्यू हा नैसर्गिक नसवा आणि तो घातपात असावा असा संशय पोलीसांनी होता. त्यानुसार पोलीस निरिक्षक बाळासाहेब खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे यांनी इतर कर्मचाऱ्यांसह चौकशीला सुरवात केली होती. या चौकशी दरम्यान दोन्ही मुलांचे वडील सदानंद पोळे घटनेच्या दिवशी दुपारी आठवडी बाजाराला शेजारच्या गावात गेले होते. येतांना मुलांसाठी खाऊ आणि पायातील चपलांचे जोड घेऊन आले. त्यावेळी मुलांची आई शितल पोळे ही घरासमोर भांडी साफ करत होती. त्यांनी मुलांबाबत विचारणा केली असता तिने मुले झोपली असल्याचे सांगितले. वडीलांनी मुलांजवळ जाऊन त्यांना उठवण्याचा प्रय़त्न केला पण ती उठली नाहीत असे वडीलांनी पोलीसांना सांगितले.

घटना घडली त्या दिवशी मुले कुठेही घराबाहेर गेली नव्हती. बाहेरूनही कोणी घरी आले नव्हते. त्यामुळे पोलीसांचा संशय अधिकच बळवला. घटनेच्या वेळी मुलांची आई एकटीच घरी होती. त्यामुळे पोलीसांनी तिची कसून चौकशी सरू केली. सुरूवातीला तीने तपास घटनेबाबत कुठलीच माहिती नसल्याचा बनाव केला. मुले सहा वाजता झोपायला गेली आणि झोपेतच त्यांचा मृत्यू झाला सांगण्याचा प्रयत्न केला पण पोलीसांना या जबाबावर विश्वास बसत नव्हता. त्यांनी पोलीसी हिसका दाखवताच, मुलांच्या आईने आपल्या दुष्कृत्याची कबूली दिली.

हेही वाचा : सोलापुरात भाजपचे राम सातपुते यांचा प्रचार मराठा आंदोलकांनी रोखला

शितल पोळे हीचे लग्नापुर्वी एका तरुणाशी प्रेमसंबध होते. हा तरूण शितल पोळे हीला लग्नानंतरही भेटत होता. यावरून शितल पोळे आणि सदानंद पोळे यांच्यात भांडणे होत होती. शितल हीला आपल्या प्रियकरा सोबत पळून जायचे होते. त्यासाठी तीने प्रियकराला लग्नही करू दिले नव्हते. पण घरातून पळून जाण्यात आराध्या आणि सार्थक ही मुले त्यात अडसर ठरणार होती. त्यामुळे पती बाहेर गेला असल्याची संधी साधून तीने आपल्या दोन्ही मुलांचा नाक व तोंड दाबून खून केला. आणि मुलांचा झोपेतच मृत्यू झाल्याचा बनाव रचला.

या नंतर जे जे रुग्णालयातून प्राप्त झालेला शवविच्छेदन अहवाल आणि शितल पोळे हीच्या जप्त केल्या मोबाईल मधील माहितीच्या आधारे, मांडवा पोलीस स्टेशनचे प्रमाभी सोमनाथ लांडे यांनी याप्रकरणी शितल पोळे हीचे विरुध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. यानंतर शितल पोळे हीला अटक करण्यात आली. तीला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

हेही वाचा : सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले

या गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे ,महीला पोलीस हवालदार अभियंती मोकल, महीला पोलीस शिपाई जयश्री पळसकर, पोलीस शिपाई अक्षय सावंत, स्वामी गावंड तसेच मांडवा सागरी पोलीस ठाणेकडील तपास पथकातील प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक सुमित खोत, सहाय्यक फौजदार सुदेश मारखंडे, पोलीस हवालदार वैभव पाटील, पोलीस हवालदार नवनाथ गावडे, पोलीस नाईक अक्षय पाटील, महीला पोलीस शिपाई चंचल शुक्ला, लक्ष्मी मेस्त्री यांनी महत्वाची भूमिका बजावली.