राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. तर विरोधकांच्या प्रश्नांवर सत्ताधारी जशास तसं उत्तर देताना दिसत आहेत. मात्र, असं असतानाच आज विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विधानसभेत चर्चा सुरु असताना विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री सभागृहात हजर नव्हते. तसेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विधानसभेत गैरहजर राहिल्यामुळे विरोधकांनी संताप व्यक्त केला. मंत्री सभागृहात उपस्थित राहत नाहीत तो पर्यंत सभागृह तहकूब करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे देखील चांगलेच संतापले. “सभागृहात मुख्यमंत्री उपस्थित नाहीत. दोन उपमुख्यमंत्री आहेत. ते दोघेही नाहीत. संबंधित खात्याचे मंत्रीही नाहीत. संबंधित विभागाचे सचिवही नाहीत. सभागृहात काय चाललंय? कशाला चालवताय सभागृह? अधिकाऱ्यांना चेंबरमध्ये बसून लोकांचं दुःख कळतं का?”, असं म्हणत भास्कर जाधव सभागृहात चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा : ‘इतर पक्षात सन्मान नाही’, वसंत मोरेंचा पक्षप्रवेश होताच उद्धव ठाकरेंची मनसेवर टीका

भास्कर जाधव काय म्हणाले?

“२०१४ साली सत्तेत असलेल्या सरकारने या सभागृहाची आणखी एक प्रथा बिघडवली आहे. ज्यावेळी महत्वाच्या विषयांवर सभागृहात चर्चा असायची त्यावेळी या सभागृहाच्या लॉबीमध्ये संबंधित विभागाचे सचिव बसलेले असायचे. हे मी स्वत:पाहिलेलं आहे. १९९५ सालापासून मी सभागृहामध्ये आहे. पण २०१४ पासून ही प्रथा बिघडवली. एकही सचिव या ठिकाणी बसत नाही. कायदा सुव्यवस्थेसंदर्भात सभागृहात चर्चा असायची त्यावेळी स्वत: डीजी आणि मुंबईचे पोलीस आयुक्त बसायचे. आता मंत्री सांगतात की संबंधित विभागाचे अधिकारी चेंबरमध्ये बसून चर्चा ऐकतात. या सरकारने अधिकाऱ्यांचे लाड करून ठेवले आहेत. त्यामुळे राज्याचं प्रशासन बिघडवण्याचं काम २०१४ पासून सुरु झालं आहे. मात्र, हे सर्व चुकीचं आहे”, असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला.

जाधव पुढे म्हणाले, “सभागृहात संबंधित खात्याचे मंत्री बसत नाहीत, सचिव बसत नाहीत. मग अधिवेशन कशासाठी सुरु आहे? प्रश्नांची दखल कोणी घ्यायची? महाराष्ट्रातील जनतेची दु:ख कोणी ऐकायची? अधिकाऱ्यांना चेंबरमध्ये बसून लोकांची दु:ख कळतील का? सरकारने या अधिकाऱ्यांना कशासाठी लाडावलं आहे. या सरकारमुळे हे अधिकारी डोक्यावर बसायला लागले आहेत. पण यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. अधिकाऱ्यांनी सभागृहाच्या लॉबीत येऊन बसलं पाहिजे. लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत”, असं भास्कर जाधव यावेळी म्हणाले.

गिरीश महाजन काय म्हणाले?

विधानसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी सत्ताधारी पक्षातील संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नसल्यामुळे विरोधक सभागृहात चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका करत काही सवाल उपस्थित केले. यावर गिरीश महाजन यांनी उत्तर देत भास्कर जाधव यांना सुनावलं. गिरीश महाजन म्हणाले, “भास्कर जाधव यांनी सांगितलं की आमचं सरकार असताना आमचे मुख्यमंत्री चर्चेला हजर राहायचे. उद्धव ठाकरे चर्चेच्या वेळी सभागृहात कधी हजर राहिले? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधीही ते चर्चेला हजर राहिले नाहीत”, असं म्हणत गिरीश महाजन यांनी भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly monsoon session shiv sena thackeray group leader bhaskar jadhav criticism of the grand coalition government gkt