नांदेड : मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचे नद्याजोड प्रकल्प हाती घेतले आहेत. बाभळी बंधाऱ्यास ७०० कोटींहून अधिकची तरतूद केली आहे. लेंढी प्रकल्पही पूर्ण केला जाईल. जालना-नांदेड महामार्गही हाती घेतला जाणार असून, राज्यात येत्या काळात दरवर्षी शेतीमध्ये पाच हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतणूक राज्य सरकार करणार आहे. त्यासाठी नानाजी देशमुख कृषी योजनेचा टप्पा दोन सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नांदेड येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ‘शंखनाद’ सभेत ते बोलत होते.

महायुतीचे सरकार आल्यापासून शंभर दिवसांत केलेल्या कामांची माहिती देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘येत्या काळात सर्वसामान्य माणसाला सरकारी कार्यालयात येण्याची गरजच भासू नये, अशी ‘ई-गर्व्हनन्स’ प्रणाली विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. ५०० हून अधिक सेवा अगदी ‘वॉट्सॲप’ वर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे कोणालाही चिरीमिरी द्यावी लागणार नाही, अशी पारदर्शी व्यवस्था उभी केली जाणार आहे.

अगदी बांधकाम परवानगीचा नकाशा मंजूर झाल्यानंतर कोणत्या टेबलावर तो किती दिवस होता, याचीही पावती आता दिली जाणार आहे. त्यामुळे झारीतील शुक्राचार्य कोण, हेही लवकरच कळेल, असे फडणवीस म्हणाले. मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्यासाठी विविध योजनांबरोबरच वर्धा-यवतमाळ रेल्वेमार्गास गती दिली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. खासदार अशोक चव्हाण यांनी सभेतील प्रास्ताविक भाषण केले.

पाकव्याप्त कॉंग्रेस

एवढे दिवस ‘पाकव्याप्त काश्मीर’ असा शब्दप्रयोग आपणास माहीत होता. पण ऑपरेशन सिंदूरनंतर जे प्रश्न पाकिस्ताननेही उपस्थित केले नाहीत, असे प्रश्न कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी करू लागले आहेत. किती विमाने पडली, किती क्षेपणास्र पडली या प्रश्नामुळे पाकव्याप्त कॉंग्रेस असेच त्यांना म्हणावे लागेल, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.