भाजपाचे एकेकाळचे खंदे नेतृत्व आणि माजी मंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांचे २०१९ साली तिकीट कापल्यानंतर त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेवर संधी देऊन सन्मानितही केले. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे स्वगृही परतत आहेत. खुद्द एकनाथ खडसे यांनीच तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षांतराची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि जळगावमधील एरंडोल-पारोळा विधानसभेचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच खडसेंना घेऊन चूक केली, अशी कबूली खुद्द शरद पवार यांनी दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

शरद पवारांनी मान्य केली चूक

जळगाव येथे माध्यमांशी बोलत असताना माजी आमदार सतीश पाटील यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. ते म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पुण्यामध्ये जळगावमधील नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सदर गोष्ट चर्चेला आली. त्याचवेळी मी शरद पवार यांना सांगितले की, खडसेंना पक्षात घेण्यासाठी मी विरोध केला होता. त्यासाठी तुमच्याशी अर्धा तास भांडलो. तरीही तुम्ही माझे म्हणणे न मानता त्यांना पक्षात घेतलं आणि आमदार केलं. त्यावेळी तुम्ही आमचे ऐकलं असतं, तर आज आपल्याला रावेरमध्ये उमेदवार शोधण्यासाठी फिरावं लागलं नसतं. त्यानंतर शरद पवार यांनी माझ्याशी बोलताना ‘खडसे यांना घेऊन चूक झाली’ हे मान्य केले.”

एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांदरम्यान रोहिणी खडसेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल; शरद पवारांचं नाव घेत म्हणाल्या…

म्हणून एकनाथ खडसेंनी रावेरचे तिकीट नाकारले

“रावेर लोकसभेतून उमेदवारी देण्यासाठी आम्ही एकमतांने एकनाथ खडसे यांचे नाव सुचविले होते. पण ऐनवेळी खडसेंनी माघार घेतल्यामुळे आमची मोठी अडचण झाली. आम्हाला नवीन उमेदवार शोधवा लागला. एकनाथ खडसे यांना पक्षात प्रवेश देणे, ही शरद पवार यांची मोठी चूक होती. त्यांच्याऐवजी एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी दिली असती, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत झाला असता”, अशी खंत डॉ. सतीश पाटील यांनी व्यक्त केली.

तसेच रक्षाताई खडसेंच्या तिकीटासाठी एकनाथ खडसे यांनी ही खेळी खेळली होती, हे आता उघड झाले आहे, असेही ते म्हणाले. “खडसे दिल्लीला का गेले होते? तिथे कुणाच्या भेटी घेतल्या आणि त्यातून काय ठरलं, हे आता लोकांसमोर आलं आहे. त्यामुळं मी आधीपासून सांगत आलोय, तेच खरं ठरलं. एकनाथ खडसे भाजपामध्ये प्रवेश करतीलच हे मी आधीपासून सांगत होतो, त्याप्रमाणे त्यांचा प्रवेश होत आहे”, असा आरोप डॉ. सतीश पाटील यांनी केला.

रोहिणी खडसे राष्ट्रवादीत कशा?

दरम्यान एकनाथ खडसे यांनी भाजपामध्ये जाण्याचे संकेत दिले असले तरी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहण्याची घोषणा केली आहे. यावर बोलताना सतीश पाटील म्हणाले की, खडसे कुटुंबाभोवती राजकारण फिरत राहतं. मी याबाबत पवारांशी बोललो. त्यांनीही रोहिणी खडसे यांची बाजू उचलून धरली. पण राष्ट्रवादीच्या रावेरमधील उमेदवारासाठी तन-मन-धनाने काम केले तर भविष्यकाळात त्यांचा विचार केला जावा, अशी मागणी केली आहे.

रोहिणी खडसे यांना आपण महिला संघटनेचे प्रदेशाध्यक्षपद दिलेले आहे. यामध्ये जर त्यांनी भावजयसाठी काम केले तर महाराष्ट्रात वेगळा संदेश जाऊ शकतो, ही खंत आमही पवारांच्या कानावर टाकली आहे. मात्र हीच रोहिणी खडसे यांची परिक्षा असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितल्याचे सतीश पाटील म्हणाले.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेताना उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी स्वीकारली होती. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची सर्व जबाबदारी मी घेतो आणि उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढवतो, असा शब्द खडसेंनी पवारांना दिला होता. पण ताकद तर काही वाढली नाही, पण जे काही वाटोळं व्हायचं ते झालं, अशी टीका माजी आमदार सतीश पाटील यांनी केली.