Supriya Sule : महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर महाविकास आघाडी आता तुटणार असल्याची चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर आरोप करत टीका करत आहेत. असं असतानाच आज (११ जानेवारी) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच ठाकरे गटाच्या या भूमिकेमुळे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पुढील भूमिका काय? यावर भाष्य करत आहेत. आता यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया देत आपलं रोखठोक मत मांडलं आहे. “महापालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे त्यांना न्याय मिळायलाच हवा”, अशी सूचक प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

खासदार सजंय राऊतांच्या स्वबळाच्या भूमिकेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, “महापालिकेच्या निवडणुका सर्व एकत्र असतानाही आम्ही वेगवेगळ्याच लढत होतो. मागची महापालिकेची निवडणूक आम्ही वेगवेगळीच लढलो होतोत. त्यात नवीन काय आहे? महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. सर्व निवडणुका जर सर्वजण आपआपल्या सोईने लढवायला लागले तर कार्यकर्त्यांनी काय सतरंज्या उचलायच्या का? मग त्यांना न्याय कधी मिळणार? त्यामुळे महापालिकेची निवडणूक ही ची कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यांना न्याय मिळायला हवा”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

हेही वाचा : Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“त्यांची इच्छा असेल स्वबळावर जायची तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण? पण विधानसभेच्या पराभवानंतर आपण एकत्रित राहायला पाहिजे होतं, असं माझं मत आहे. त्यामुळे हा निर्णय फार घाईने घेतलेला दिसतोय. ग्राऊंडवर कार्यकर्त्यांचं मत काय आहे हे आम्हाला माहितेय. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे असं वाटत नाही. शेवटी बळंच कोणाला तरी घेऊन जाणं आम्हाला पटणारं नाही. अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. व्यक्तिगत पक्षाला संधी मिळत नाही, असं नाही. आमच्याही कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. आपण मतविभागणीचा फटका लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पाहिला आहे. मतविभागणीमुळे आपल्या ४५ जागा गेल्या आहेत. पण त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही. कारण तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. परंतु, आगामी पालिका निवडणुकीत याचा फटका १०० टक्के बसणार आहे”, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

ठाकरे गटाने काय घोषणा केली?

“मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. मग काय होईल ते होईल? एकदा आम्हाला आमची ताकद आजमावायची आहे. आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आम्हाला उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील संकेत दिलेले आहेत. आमचं असा निर्णय होत आहे की मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर असेल. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? कारण आघाडीत आणि विधानसभेत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये निवडणुका स्वबळावर लढून आपआपले पक्ष मजबूत करावे लागतात”, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mp supriya sule on municipal elections 2025 shivsena thackeray group and mahavikas aghadi politics gkt