Rahul Gandhi On Phaltan Women Doctor Case : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या डॉक्टर तरुणीने स्वत:चं जीवन संपवण्यापूर्वी तळहातावर सुसाइड नोट लिहित दोन जणांवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी निलंबित पीएसआय आणि आणखी एकाला पोलिसांनी अटक केलं असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या या प्रकरणावर आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा खासदार राहुल गांधींनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया देत गंभीर आरोप केले आहेत. “ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे”, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे. तसेच या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील भाजपा सरकारचं अमानवी आणि निर्दयी स्वरूप उघडकीस आलं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

“बलात्कार आणि छळाला कंटाळून महाराष्ट्रातील साताऱ्यातील फलटण येथील एका डॉक्टर तरुणीने केलेली आत्महत्या ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी आहे. इतरांच्या वेदना कमी करण्याची आकांक्षा बाळगणारी एक डॉक्टर मुलगी, भ्रष्ट शक्ती आणि व्यवस्थेत बसलेल्या गुन्हेगारांच्या छळाची बळी ठरली. ज्याला गुन्हेगारांपासून जनतेचं रक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, त्याने या निष्पाप मुलीवर सर्वात भयंकर गुन्हा केला, तिच्यावर बलात्कार आणि तिचं शोषण केलं”, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

“भाजपाशी संबंधित काही प्रभावशाली व्यक्तींनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सत्तेने संरक्षित असलेल्या गुन्हेगारी विचारसरणीचे हे सर्वात भयानक उदाहरण आहे. ही आत्महत्या नाही, तर ती संस्थात्मक हत्या आहे. जेव्हा सत्ता गुन्हेगारांना संरक्षण देते, तेव्हा आपण कोणाकडून न्यायाची अपेक्षा करू शकतो? या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूने या भाजपा सरकारचं अमानवी आणि निर्दयी स्वरूप उघडकीस आलं आहे. न्यायाच्या या लढाईत आम्ही पीडितेच्या कुटुंबाबरोबर खंबीरपणे उभे आहोत. आम्हाला न्याय हवा आहे”, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांनी काय म्हटलं?

फलटण येथील उपजिल्हारुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांवर आरोप केले जात आहेत. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. तरूण डॉक्टरचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. याबरोबरच त्यांनी अशा संवेदनशील विषयाचे राजकारण करणे अत्यंत असंवेदनशील असल्याचेही म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खूपच गंभीर प्रकरण आहे. कारण एक तरूण डॉक्टर स्वत:च्या हातावर आपल्या मनातील वेदना लिहून आत्महत्या करते ही आमच्यासाठी एक दु:खद गोष्ट आहे. त्यामुळे सरकारने कालच जो संबंधित पोलीस अधिकारी आहे, त्याला निलंबित केले आहे. अटक करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. कोणालाही सोडलं जाणार नाही. जे कोणी सहभागी असतील त्यांना कठोरता कोठोर शिक्षा दिली जाईल.”