Raj Thackeray Devendra Fadnavis alleged Meeting : महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये प्रतिष्ठित मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचाही समावेश आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू (राज ठाकरे व उद्धव ठाकरे) एकत्र येतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगतेय. शिवसेना (ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती व्हावी यासाठी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. तसेच शिवसेना (शिंदे) व मनसे युतीसाठी प्रयत्न होत असल्याचे दावे केले जात आहेत.
दरम्यान, आज (१२ जून) राज्याच्या राजकारणात एक मोठी घटना घडली आहे. मुंबईतील वांद्रे येथील ताज लॅन्ड्स एंड या हॉटेलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा आहे. अनेक वृत्तवाहिन्यांनी याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. तसेच दोन्ही नेत्यांच्या कार या हॉटेल परिसरात दिसल्याचं सांगितलं आहे.
एका बाजूला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा रंगत असताना दुसऱ्या बाजूला राज ठाकरे व फडणवीस यांची भेट झाल्याचे दावे केले जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. तर, मुख्यमंत्री फडणवीसही काही वेळापूर्वी याच हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. हॉटेलमध्ये हे दोन नेते भेटले की नाही, त्यांच्यात काही चर्चा झालीय की नाही याबाबत अधिकृत माहिती सध्या मिळालेली नाही. मात्र, दोन्ही नेते एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये पोहोचणं हा योगायोग आहे की राजकीय भेट आहे याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
भेटीचं उद्दीष्ट समजल्याशिवाय भाष्य करणं अनुचित : किशोरी पेडणेकर
या कथित भेटीबद्दल वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेना (ठाकरे) नेत्या किशोरी पेडणेकर याबाबत म्हणाल्या, “ही भेट नेमकी कशासाठी झाली आहे ते समजत नाही तोवर याबद्दल बोलणं उचित ठरणार नाही. राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस कोणत्या कारणासाठी भेटले आहेत ते माहिती नसताना त्यावर वक्तव्य करणं घाईचं ठरेल.
वाटाघाटी करण्यासाठी वातावरणनिर्मिती? रोहित पवारांचा प्रश्न
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले, “राज ठाकरे हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना भेटत असतील तर आम्ही असं म्हणायचं का भाजपाबरोबर वाटाघाटी करण्यासठी राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या अफवा उठवल्या गेल्या. कारण गेल्या काही दिवसांत ठाकरे कुटुंबाच्या बाजूने वातावरण तयार झालं होतं. सामान्य माणसाच्या भावना ठाकरे कुटुंबाच्या बाजूने होत्या. चांगलं वातावरण तयार झालं होतं. मात्र, राज ठाकरे फडणवीसांना भेटत असतील, त्यांच्याबरोबर चर्चा करत असतील. तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की हे सगळं केवळ वातावरणनिर्मिती करण्यासाठी केलं गेलं का? मनसेने वाटाघाटी करायला वातावरणनिर्मिती केली का असा प्रश्न पडला आहे. या सगळ्यामुळे राज ठाकरे यांचं नाव खराब होऊ शकतो.