राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यावेळी लोकसभेच्या १० जागा लढवत आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव पाहाता १० जागा कमी असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आमचं लक्ष्य विधानसभा निवडणुकांवर असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अमित शाहांच्या प्रश्नांवर खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. शिवाय, अजित पवारांवरूनही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. यावेळी नगर जिल्ह्यातील राजकारणाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी विखे पाटलांना टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आमचं लक्ष्य विधानसभेवर”

शरद पवारांनी आपलं लक्ष्य विधानसभेवर असून तिथे जास्तीत जास्त उमेदवार विधानसभेत पाठवण्याचा प्रयत्न राहील, असं म्हटलं आहे. “महाराष्ट्रात निवडणुकीचा पहिला टप्पा झाला. आणखी चार टप्पे आहेत. महाविकास आघाडीनं सगळ्या जागा लढवायचा निर्णय घेतला. सुदैवाने एखाद-दुसऱ्या जागेचा विषय सोडला, तर सबंध राज्यात जागावाटपाबाबत मविआमध्ये एकवाक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेच्या जागा कमी घेतल्या. हा निर्णय आम्ही जाणीवपूर्वक घेतला. आमचं अधिक लक्ष विधानसभेवर आहे. तेव्हा अधिक जागा लढवण्याचा प्रयत्न करणं आणि विधिमंडळात अधिक आमदार पाठवणं हा आमचा विचार आहे”, असं ते म्हणाले.

भाजपाला टोला!

“भाजपानं दिलेला ४०० पारचा नारा चुकीचा वाटतो. लोकसभेची संख्या ५४४ आहे. तेवढा आकडा जर त्यांनी सांगितला असता, तर तो मी अधिक खरा मानला असता”, असा टोलाही त्यांनी लगावला.

१० वर्षं शरद पवारांनी नेमकं काय केलं – अमित शाह

दरम्यान, अमित शाह यांनी “शरद पवारांनी १० वर्षांत काय केलं?” असा प्रश्न विचारल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता त्यावर शरद पवारांनी अमित शाह यांनाच प्रतिप्रश्न केला. “ते ठिकठिकाणी मला विचारतात. २०१४ ते २०२४ या १० वर्षांत पवारांनी काय केलं? मी एवढंच सांगेन, १० वर्षांत मी सत्तेत नव्हतो, ते सत्तेत होते. त्यामुळे या १० वर्षांत त्यांनी काय केलं हे सांगण्याची जबाबदारी त्यांची आहे. सत्तेत नसणाऱ्यांची नाही. त्यांच्याआधी १० वर्षं मी सत्तेत होतो, तेव्हा माझ्या काळात शेतीचं काय काम झालं, हे सगळ्या जगाला माहिती आहे”, असं शरद पवार म्हणाले.

निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नये म्हणून महसूलमंत्र्यांनी उद्योगपतीला माझ्याकडे पाठवले! शरद पवार यांचा नगरच्या सभेत खळबळजनक दावा

विखे-पाटलांबाबत खोचक सवाल

“शरद पवारांनी जिल्ह्यातल्या नेत्यांमध्ये भांडणं लावून जिल्ह्याचं वाटोळं केलं”, असं राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटल्याबाबत विचारणा केली असता त्यावरही शरद पवारांनी टोला लगावला. “त्यांच्याबद्दल भाष्य करणंही मला योग्य वाटत नाही. त्यांच्यात सातत्य नाही. कधी शिवसेनेत, कधी काँग्रेसमध्ये.. आता हल्ली कुठे आहेत ते? भाजपामध्ये आहेत. या बाबतीत त्यांचा पराक्रम सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे”, असं शरद पवार म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जलसिंचन घोटाळ्याचा आरोप केल्याबाबत यावेळी पत्रकारांनी शरद पवारांना विचारणा केली, तेव्हा त्यांनी अजित पवारांचं नाव न घेता टोला लगावला. “नरेंद्र मोदींनी याआधीही जलसिंचन घोटाळ्याबाबत आरोप केले होते. तेव्हा त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले, त्यांना आता सोबत घेऊन ते फिरत आहेत”, असं शरद पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar mocks amit shah narendra modi vikhe patil pmw