शिवसेना उबाठ गटाच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरच चव्हाण यांनी ईडीने अटक केली आहे. तर ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणेची धाड पडली आहे. या घडामोडींवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “सध्या सगळीकडेच धाडी पडताहेत, नोटा सापडत आहेत. खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके सापडतात त्यात आमचा काय दोष आहे?” कारवाई करणे हे यंत्रणेचे काम असते. जिथे चुकीचं काही होत असेल त्याची माहिती अधिकाऱ्यांना असते. त्यानुसार ते त्या ठिकाणी छापा टाकून कारवाई करत असतात, असेही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“शिंदे गटात आला नाहीत तर तुमच्यावर एजन्सींच्या मार्फत कारवाई होईल, अशा धमक्या ठाकरे गटातील नेत्यांना दिल्या जात आहेत. सूरज चव्हाण, रविंद्र वायकर, राजन साळवी यांना धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसंच आम्ही दोन दिवसांपूर्वी जे जनता न्यायालय भरविले आणि त्याचा प्रभाव पडल्यामुळेच दुसऱ्या दिवशी सूरज चव्हाण यांना अटक झाली. सूरज चव्हाण यांची अटक ही राजकीय अटक आहे”, असा आरोप संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला होता. तसेच शिंदे गटातील नेत्यांनी आठ हजार कोटींचा घोटाळा केला, असाही आरोप राऊत यांनी केला. यावर प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, अरे सोन्या वर्तमानपत्रात अग्रलेख लिहिण्याएवढं आरोप करणं सोपं नसतं. घोटाळ्याचा आरोप करताना कागदपत्रे द्यावी लागतात. त्यामुळे संजय राऊतांनी आधी कागदपत्रे द्यावीत, असे ते म्हणाले.

हे वाचा >> “सूरज चव्हाण यांची अटक राजकीय, शिंदे गटाने ८ हजार कोटींचा…”, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

आयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिर प्रतिष्ठापना होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानुसार बैठका घेण्यात आल्या. त्यानुसार झेंडे वाटप, अक्षता वाटप आणि मंदिरांची साफसफाई सुरू आहे. संपूर्ण गावात झेंडे, दिवे लावून संपूर्ण वातावरण राममय करण्याचे आणि ढोल ताशाच्या गजरात प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार तयारी आणि नियोजन केले जात आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात सगळीकडे भगवे आणि प्रभू रामचंद्रांचे फोटो असलेले पताके लावण्याची तयारी सुरू आहे. संपूर्ण नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे. दिवाळीच्या सणापेक्षाही मोठ्या जल्लोषात २२ जानेवारी रोजी राम प्रतिष्ठापनेचा दिवस साजरा केला जाईल.

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर जळगाव ग्रामीण मतदारसंघातील कार्यकर्ते आणि राम भक्तांना एका ट्रेनने अयोध्येत नेण्याचा विचार आहे. यानिमित्ताने कार्यकर्त्यांसह थोडा वेळ घालविता येईल आणि देवदर्शन होईल, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच २२ जानेवारी रोजी जळगाव जिल्ह्यात सुट्टी देण्याबाबत निवेदने आली आहेत. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली जाईल. हा माझा एकट्याचा निर्णय नाही हा निर्णय सर्वानुमते घ्यावा लागेल, त्यासाठी चर्चा करू, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde faction gulabrao patil slams ubt faction over central agencies prob kvg