सोलापूर : मागील पाच वर्षांत पहिली अडीच वर्षे महाविकास आघाडी आणि दुसरी अडीच वर्षे महायुती सरकारच्या कालावधीत सोलापूरला स्वतःचा हक्काचा पालकमंत्री मिळाला नाही. जिल्ह्याबाहेरील मंत्र्यांनी पालकमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. त्यामुळे अनेक स्थानिक विकासाचे प्रश्न रेंगाळले आहेत. यंदाच्या सत्ताधारी महायुतीकडून सोलापूरला स्वतःचा पालकमंत्री मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यापूर्वी दिवंगत नेते राजारामबापू पाटील, ज्येष्ठ नेते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील, अशा दिग्गज नेत्यांनी सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. १९८२-८३ साली तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. बाबासाहेब भोसले यांच्या औटघटकेच्या काळात सोलापूरचा स्वतःचा पालकमंत्री लाभला नव्हता. त्यानंतर ३५-४० वर्षांच्या कालखंडानंतर मागील पाच वर्षे सोलापूर जिल्हा मंत्रिपदापासून वंचित राहिला होता. त्यामुळे साहजिकच पालकमंत्रिपद दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड, दत्तात्रय भरणे, राधाकृष्ण विखे- पाटील, चंद्रकांत पाटील यांनी आपापल्या परीने पालकमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. यातून सोलापूरला अपेक्षित न्याय मिळू शकला नाही. अनेक विकासाचे प्रश्न रेंगाळत पडले आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाच्या महायुतीच्या नवीन सरकारमध्ये सोलापूरला स्वतःचा हक्काचा पालकमंत्री मेळावा, अशी आशा सोलापूरकर बाळगून आहेत.
हेही वाचा : मारकडवाडीसह सर्व ठिकाणी ईव्हीएम मतदानात पारदर्शकता, जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे स्पष्टीकरण
सोलापूरच्या नवीन विमानतळासह विमानसेवा, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयाचा विस्तार, शहर हद्दवाढ भागातील वर्षानुवर्षे रेंगाळलेले पायाभूत विकासाचे प्रश्न, केळी संशोधन केंद्र, पंढरपुरी म्हैस संशोधन केंद्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा विस्तार, एसटी स्थानक सुधारणा, उजनी-सोलापूर समांतर पाणी योजना, भूमिगत गटार बांधणी, पर्यटन विकासाला चालना व इतर रेंगाळलेल्या विकास प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आस्था दाखविणारा पालकमंत्री सोलापूरच्या मातीतला असेल तरच खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकतो, असे सोलापूरकरांचे म्हणणे आहे.
© The Indian Express (P) Ltd