राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळं असतं असं विधान राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर भाषणामध्ये केल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं. शिवसेनेनंही या प्रतिक्रियेवर उत्तर दिलं. या वक्तव्याच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही मोठे पक्ष पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं चित्र दिसलं. मात्र आता या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्यासंदर्भात यशोमती ठाकूर यांनी वक्तव्य करत स्पष्टीकरण दिलं आहे.
नेमकं घडलं काय?
शरद पवार हे रविवारी अमरावती दौऱ्यावर होते. अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावर व सभागृहाचे लोकार्पण सोहळाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शरद पवारांबरोबरच महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूरांसहीत इतर नेतेही उपस्थित होते, या कार्यक्रमात मंत्री यशोमती ठाकूर यांनी बोलतांना मुख्यमंत्री पदाबाबद मोठं वक्तव्य केलं.
यशोमती ठाकूर काय म्हणाल्या?
“शरद पवारांसाठी काय आणि किती बोलावं. छोट्या तोंडी मोठा घास घेतेय पण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राचं चित्र अजून वेगळं असतं,” असं यशोमती ठाकूर म्हणाल्यानंतर काही उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. त्यावर पुन्हा बोलताना, “टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. पावरांसाठी जोरात टाळ्या वाजवा,” असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.
नक्की वाचा >> पवारांच्या घरावरील हल्ल्याला भाजपाची फूस असल्याचा शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “माकडांची माणसं झाली पण काही…”
कोणी कितीही तीर मारले तरी…
“चार वेळा पवार मुख्यमंत्री झाले पण आज काळाची गरज आहे. ज्यावेळेस महाविकास आघाडी झाली तेव्हा पवार मला म्हणाले होते मी ऐकलं तुझं टीव्हीवर. मला कोणी काही सांगितलं नव्हतं. पण पवार या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत आहेत. आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. कोणीही कितीही काहीही तीर मारले तरी महाराष्ट्रातील सरकार स्थीर राहणार असं या ठिकाणी मी सांगते,” असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं.
शिवसेनेनं दिलं उत्तर…
यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेची भूमिका मांडताना पक्षाच्या प्रवक्त्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एक व्हिडीओ प्रतिक्रिया रात्री पावणे अकराच्या सुमारास जारी केली. यामध्ये नीलम गोऱ्हे यांनी खोचकपद्धतीने शिवसेनेच्या राष्ट्रवादीला टोला लगावलाय. “आज नामदार यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमध्ये असं विधान केलं आहे की, शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर वेगळं चित्र दिसलं असतं. शरद पवार यांच्या कार्यक्षमता आणि नेतृत्वाबद्दल कुठली शंकाच नाहीय,” असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.
नक्की पाहा >> सिल्व्हर ओक आंदोलन Video: पोलीस कर्मचारी आंदोलनकर्त्या महिलेला धक्का देत असतानाच सुप्रिया सुळेंनी तिचा हात पकडला अन्…
यशोमती ठाकूर यांना विचारला प्रश्न…
तसेच पुढे बोलताना, “मला तर वाटतं त्यांना युपीएचं अध्यक्ष करावं, म्हणजे सगळ्या भारतालाच उपयोग होईल,” असा टोला नीलम गोऱ्हेंनी लागवला आहे. त्याचप्रमाणे, “यशोमतीताई तुम्ही असा प्रस्ताव द्याल का?” असा प्रश्नही त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिलेल्या प्रतिक्रियेच्या शेवटी विचारलाय.
स्पष्टीकरण देताना काय म्हणाल्या?
यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यावरुन शिवसेनेची प्रतिक्रिया आल्यानंतर आज पत्रकारांनी त्यांना ‘पवार मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळं असतं,’ या वक्तव्यामागील उद्देश काय होता असा प्रश्न विचारला. “पवारांचं मार्गदर्शन आपल्याला कायमच हवं असतं. निवडणुका नुकत्याच झाल्या होत्या तेव्हाची मी आठवण करुन दिली. आज महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही आहोत. त्याचं कौतुक आम्हाला नेहमीच आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याने महाविकास आघाडीत एकी आहे. आमचं सरकार पुढील पाचही वर्ष नक्कीच जोमाने काम करेल,” असं उत्तर यशोमती ठाकूर यांनी दिलं.
“या गोष्टीचा विपर्यास करण्याची काही गरज नाहीय. पवारसाहेब पितामह: म्हणून आमच्यासोबत आहेत. त्यांचं मार्गदर्शन सतत आम्हाला हवं असतं. तो एक भावनिक कार्यक्रम होता. त्यात मी केवळ व्यक्त झाले. माझी विनंती राहिली की कोणी त्या वक्तव्याचा विपर्यास करु नये. कोणी इगोवर घेऊ नये. महाविकास आघाडी आहे आणि पुढेही राहणार. उद्धव ठाकरे हे आमचा मान-सन्मान आहे आणि तो ही कायम राहणार,” असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.