बिपाशा बासू ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘राज’, ‘जिस्म’, ‘नो एंट्री’, ‘ओमकारा’, ‘बचना ऐ हसीनों’, ‘रेस’ व ‘आक्रोश’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मात्र, गेल्या काही वर्षात ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. आई झाल्यापासून ती सिनेक्षेत्रापासून दूर आहे. त्यावेळी बिपाशा बसूने मॉडेलिंग क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता. तेव्हा तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या.
त्याकाळात विनोद खन्ना यांना बिपाशाने त्यांचा मुलगा अक्षय खन्नाबरोबर नायिका म्हणून काम करावं असं वाटतं होतं; पण बिपाशाने तेव्हा ही ऑफर नाकारली होती. यासाठी ती अजूनही लहान असल्याचं तिला वाटलं होतं. पण नंतर बिपाशाला अभिषेक बच्चनबरोबर पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. दोघेही मुख्य भूमिकेत असलेल्या ‘आखरी मुघल’ चित्रपटात काम करणार होते.
‘आखरी मुघल’मध्ये अभिषेक बच्चन आणि बिपाशा बसू यांच्याशिवाय दिलीप कुमारही होते. पण हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. याबद्दल अभिषेक बच्चनने सांगितलं होतं की, त्याचा पहिला चित्रपट ‘आखरी मुघल’ होता. ज्यामध्ये त्याला दिलीप कुमार यांच्या मुलाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. पण हा चित्रपट बनू शकला नाही.
बिपाशाने एकदा या चित्रपटाबद्दल म्हटलं होतं की, “‘आखरी मुघल’चं शुटींग नुकतंच सुरू झालं होतं. मी आणि अभिषेक आमच्या पदार्पणासाठी तयार होतो. मला आठवतंय की, तेव्हा सेटवर अमिताभ बच्चन यांना पाहून मी थोडी घाबरले होते. ते त्यादिवशी आमचं काम पाहण्यासाठी सेटवर आले होते. पण तेव्हा मी अभिषेकला त्याच्या वडिल अमिताभ यांना सेटवरून निघून जाण्यासाठी सांगितलं होतं.”
घाबरलेल्या बिपाशाने अभिषेक बच्चनला “कृपया तू तुझ्या वडिलांना इथून जाण्यास सांग ना…” असं म्हटलं होतं, त्यावर अभिषेक असं म्हणालेला की, “ते माझे वडील आहेत. मी त्यांना इथून जायला कसं सांगू शकतो?”. दरम्यान, या चित्रपटावेळी बिपाशाला खूप अस्वस्थ वाटायचं. शिवाय चित्रपटाच्या पटकथेत काहीतरी कमतरता होती. म्हणून जेपी दत्ता यांना वाटलं की, चित्रपट बनवला तरी तो फ्लॉप होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी हा चित्रपट करणं थांबवलं.
‘आखरी मुघल’साठी जया बच्चन यांनी बिपाशाचं नाव सुचवलं होतं. चित्रपटाचे दिग्दर्शक जेपी दत्ता आणि जया बच्चन यांनी बिपाशाशी संपर्क साधला होता. तेव्हा ती या दिग्गजांना नाही म्हणू शकली नाही. ‘बंगलोर टाईम्स’नुसार, या चित्रपटाबद्दल ती असं म्हणालेली की, “‘आखरी मुघल’ हा चित्रपट बंद पडल्याने मला आनंद झाला होता. हे थोडं विचित्र आहे; पण मी अशीच आहे.”
‘आखरी मुघल’ हा चित्रपट बंद पडल्यानंतर, अभिषेक बच्चनने करीना कपूरबरोबर ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून पदार्पण केले. तर बिपाशा बासूने ‘अजनबी’ या चित्रपटामधून. या चित्रपटात तिच्याबरोबर अक्षय कुमार आणि बॉबी देओल हे कलाकारदेखील होते. या चित्रपटात बिपाशा नकारात्मक भूमिका साकारताना दिसली होती. ती शेवटची ‘डेंजरस’ या वेब सीरिजमध्ये पती करण सिंग ग्रोव्हरबरोबर दिसली होती.