मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेवरील लोकल आणि एक्स्प्रेस सेवा विस्कळीत होते. परिणामी, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन रेल्वेने पायाभूत सुविधांमध्ये वाढ करून तांत्रिक बिघाडाचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी एप्रिल – जूनच्या तुलनेत यंदा सिग्नल यंत्रणा, रेल्वे इंजिनमध्ये होणारे बिघाड आणि रेल्वे रुळाला तडे जाण्याच्या प्रमाणात २७.५४ टक्क्यांनी घट झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे, सोलापूर या पाच विभागांमध्ये १ एप्रिल ते १२ जून २०२२ या कालावधीत वारंवार बिघाड होत होते. या काळात तांत्रिक बिघाडाचे प्रमाण ५९.६७ टक्के होते. यावर उपाययोजना करण्यात आली असून यंदा याच कालावधीत तांत्रिक बिघाडाचे प्रमाण २७.५४ टक्क्यांनी कमी झाले आहे. १ एप्रिल ते १२ जून २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेवरील तांत्रिक बिघाडाचे प्रमाण ३२.१३ टक्के आहे.

हेही वाचा >>>आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले…

गेल्यावर्षी एप्रिल – जून या कालावधीत मध्य रेल्वेच्या विद्युत आणि डिझेल लोको बिघाडाच्या ९७ घटना घडल्या होत्या. यंदा याच कालावधीत ७४ लोको बिघाडाच्या घटना घडल्या. गतवर्षीच्या तुलनेत यंदा त्यात २३.७१ टक्क्यांनी घट झाली. गेल्यावर्षी ५० लोकलच्या युनिटमध्ये दोष आढळून आला होता. तर, यंदा ३३ दोषांची प्रकरणे समोर आली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३४ टक्क्यांनी लोकल युनिट दोषाची प्रकरणे कमी झाली आहेत. गेल्या वर्षी रेल्वे रुळाला तडा गेल्याच्या २०१ घटना घडल्या होत्या. तर, यंदा १४५ घटना घडल्या असून त्या २७.८६ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच गेल्या वर्षी सिग्नल बिघाडाची १७७ प्रकरणे घडली होती. यंदा १२४ प्रकरणे घडली असून त्यात २९.९४ टक्क्यांनी घट झाली आहे.

हेही वाचा >>>मुंबईत पुढील दोन तासांत मुसळधार पावसाची शक्यता

रेल्वेचा वक्तशीरपणा कमी होण्याची कारणे

मध्य रेल्वेवरून १ एप्रिल ते १२ जून या कालावधीत ३७ हजार ४० मेल-एक्स्प्रेस धावल्या. तर दररोज १,८१० लोकल सेवा धावता होत्या. एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत, मध्य रेल्वेवरील मेल-एक्स्प्रेसचा वक्तशीरपणा ८५ टक्के आणि लोकलचा वक्तशीरपणा ९५ टक्के होता. अनुक्रमे १५ आणि ५ टक्के वक्तशीरपणा हा आपत्कालीन साखळी खेचल्यामुळे, इतर विभागातून मेल-एक्स्प्रेस उशिरा धावत असल्याने वक्तशीरपणा कमी झाला आहे. तसेच, प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडण्याच्या घटना, रेल्वे रुळावर आत्महत्या करणे, खराब हवामान आणि डॉक्टरांना रेल्वेगाडीमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी बोलवण्याच्या घटना आदींमुळे रेल्वेगाड्यांचा खोळंबा होतो.

हेही वाचा >>>“चाणक्य अन् त्यांची कूटनीती…”, उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

संपूर्ण मध्य रेल्वेमध्ये समांतर रस्ता दरवाजे कायमस्वरूपी बंद करण्याचे काम सुरू आहे. तसेच आपत्कालीन साखळी ओढणाऱ्या प्रवाशांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी वारंवार प्रवाशांना आवाहन करण्यात येत असून सरकते जिने, लिफ्ट, पादचारी पूल उभारण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 27 percent reduction in technical breakdowns of central railway mumbai print news amy