वेदांतचा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जाणार असल्याच्या बातमीनंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खोके सरकारला महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यास इच्छा नाही. पिस्तुल चालवणं, धक्काबुक्की करण्यापेक्षा महाराष्ट्रात गुंतवणूक कशी येईल यावर लक्ष द्या,” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर हल्ला चढवला.
आदित्य ठाकरे म्हणाले, “वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारने मोठ्या प्रमाणात काम केलं, सगळं पाठबळ दिलं. त्यानंतरही हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेला. याचा अर्थ हाच आहे की नवीन गुंतवणूकदारांना या खोके सरकारवर विश्वास नाही. आज आपण बघत आहात की खोके सरकार हे राजकारणात व्यस्त आहे. प्रशासनावर असेल, कायदा सुव्यवस्थेवर असेल कोणाचा अंकुश दिसत नाही. म्हणून या गोष्टी होत आहेत.”
“खोके सरकारने पिस्तूल काढणं, धक्काबुक्की करणं सोडावं”
“माझी हीच विनंती राहील खोके सरकारला पिस्तूल काढणं, धक्काबुक्की करण खोके गुंड गर्दीची भाषा करणं सोडून द्यावं आणि मोठ्या इंडस्ट्रीजना आपल्या राज्यात आणण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल,” असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला.
आदित्य ठाकरे वेदांत प्रकल्पावर म्हणाले, “वेदांतचा प्रकल्प आहे तो गुजरातला गेला आहे. वेदांत आणि गुजरातला माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्या देशात एवढा मोठा प्रकल्प येणं हे चांगलंच आहे, मात्र आम्ही या प्रकल्पसाठी एक वर्षात अनेक बैठका घेतल्या. अनेक भेटी देऊन पुण्याच्या जवळ हा प्रकल्प येईल अशी काळजी घेतली. त्यासाठी आम्ही काम करत होतो.”
“महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला गेल्याची बातमी वाचून धक्का बसला”
“मागच्या महिन्यात खोके सरकारदेखील आमच्याच कामावर पुढे गेलं आणि महाराष्ट्राला आश्वासन मिळालेला हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहे असं वाटलं. मात्र, आज या प्रकल्पाची बातमी वाचून थोडा धक्का बसला. हा मोठा प्रकल्प गुजरातला गेलेला आहे. कोणत्याही राज्यात गेले त्याचे दुःख नाही, मात्र हा प्रकल्प आपल्या राज्यात आला कसा नाही याचं आश्चर्य आहे,” असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.