मुंबई महापालिकेच्या दोन शिपायांचं निलंबन करण्यात आलं आहे. करोना काळात पत्नीच्या नावाने कंपनी तयार करत, कंत्राट घेतल्याचा आरोप या दोन शिपायांवर आहे. याच आरोपांखाली त्या दोघांचेही निलंबन करण्यात आले आहे. यावरून आता मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना(ठाकरे गट) आणि अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
नक्की पाहा – PHOTOS : लाकडी ओंडक्यापासून आकाराला आले सुंदर पशुपक्षी; उद्यानाच्या सौंदर्यात पडली भर
आशिष शेलार म्हणाले, ‘पत्नीच्या नावे कंपन्या उघडून मुंबई महापालिकेतील कंत्राटे मिळवणाऱ्या डि वार्ड मधील दोन शिपायांना निलंबित करण्यात आले. मुंबई महापालिकेत गेली २५ वर्षे मित्र, नातेवाईक, कुटुंबीय, मेव्हणे, पाहुणे सगेसोयरे यांच्या मार्फत मुंबईकरांच्या पैशाची अशीच लूट केली.’
याशिवाय ‘अशी अधिकारी, सत्ताधारी नगरसेवकाच्या नातेवाईकाच्या कंपन्याना किती कंत्राटे दिली? आता मेव्हणे,पाहुण्यांना कंत्राटे मिळत नाहीत म्हणून पेग्विन सेना प्रमुख थयथयाट तर करीत नाहीत ना? पालिकेत शिपायांपासून सत्ताधाऱ्यांपर्यंत यत्र तत्र सर्वत्र माझं कुटुंब माझी जबाबदारी!’ असंही शेलार यांनी म्हटलं आहे.