उमाकांत देशपांडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : आगामी महापालिका आणि पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ‘मराठी मुस्लीम’ संकल्पनेला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि मुस्लीम मते आपल्याकडे आकर्षित झाली नाहीत, तर किमान विरोधात जाऊ नयेत, यासाठी भाजपने व्यापारी व कष्टकरी मुस्लिमांवर  लक्ष्य ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोहरा समाजाच्या शिक्षणसंस्थेच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी मुंबईत येत असून मुस्लीम समुदायाबरोबर सौहार्द वाढविण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.

राष्ट्रीय नागरिकत्व सूची (एनआरसी)  आणि नागरिकत्व कायद्यातील सुधारणांवरून  केंद्र सरकारविरोधात देशभरात वातावरण तयार झाले होते. हे वातावरण निवळावे आणि मुस्लीम व अन्य धर्मीयांशी सौहार्द वाढावा, यासाठी भाजपच्या केंद्रीय वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न सुरू केले. भाजप मुंबई अध्यक्ष आशीष शेलार व इतरांच्या माध्यमातून बोहरा समाज आणि अन्य मुस्लीम पंथीयांमधील मौलवी व मान्यवरांच्या शिष्टमंडळांनी नवी दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदी व अन्य नेत्यांच्या भेटीगाठी गेल्या एक-दीड वर्षांत घेतल्या आहेत.

भाजपचे गुजरातमध्ये बोहरी समाजाशी चांगले संबंध असून त्यातील बहुतांश लोक व्यापारी वर्गातील व शांतताप्रिय आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईसह कोकणातील मराठी मुस्लिमांना साद घालून आपल्याबरोबर वळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने व् सुधारणावादी आणि बेकरी, भंगार, टायर व अन्य व्यवसायांतील गरीब मुस्लिमांकडे ‘लक्ष्य’ पुरविण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी हे मुंबई दौऱ्यात बोहरी समाजाचे सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्यासमवेत ‘अरेबिक’ शिक्षणसंस्थेचे उद्घाटन करणार आहेत. भेंडीबाजारातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे काम सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी) च्या माध्यमातून सुरू असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी काही कामांची पायाभरणी केली.

‘सबका साथ, सबका विकास’ हे उद्दिष्ट ठेवून देशाच्या विकासाच्या वाटचालीत भाजपने नेहमीच सर्वाना बरोबर घेतले आहे. विकासाचा विचार करताना जातपात, धर्म व कुठलेही भेदाभेद केले जात नाहीत.  भाजपकडून सर्वधर्मीयांशी सौहार्दाचे संबंध ठेवले जातात. त्याचा निवडणुकीशी संबंध जोडणे चुकीचे आहे.

– अतुल भातखळकर, आमदार, मुंबई भाजप प्रभारी

७० प्रभागांमध्ये लक्षणीय संख्या

मुंबईत २०-२५ लाखांहून अधिक मुस्लीम लोकसंख्या असून महापालिका निवडणुकीचा विचार करता ७० प्रभागांमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या प्रभागांमध्ये एमआयएमने आपले उमेदवार उभे केले होते. मालवणी, गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर, कुर्ला व अन्य भागांत हे प्रभाग आहेत व अन्य ठिकाणीही मुस्लीम मतदार विखुरलेले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Battle for muslim votes strategy by bjp to counter shiv sena strategy ysh