मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत यंदा मुंबई विभागातील ८ विद्यार्थ्यांना पैकीच्यापैकी म्हणजे १०० टक्के गुण मिळाले आहेत. उत्तीर्णांचे प्रमाण मात्र साधारण गेल्यावर्षी प्रमाणेच आहे. यंदा मुंबई विभागाचा निकाल ९५.८४ टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्णतेच्या टक्केवारीत केवळ एका पूर्णांकाने वाढ झाली आहे. यंदा नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी मुंबई विभागातून नियमित ३ लाख ३७ हजार ३८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ लाख ३५ हजार ५०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि ३ लाख २१ हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा निकालाची एकूण टक्केवारी ही ९५.८४ टक्के इतकी आहे. विभागाच्या निकालाची एकूण टक्केवारी २०२४ साली ९५.८३ टक्के, २०२३ साली ९३.६६ टक्के आणि २०२२ साली ९६.९४ टक्के इतकी होती.

गतवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई विभागात नव्वदीपार गुणवंतांची संख्या वाढलेली आहे. मुंबई विभागातील १७ हजार ८९५ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले असून गतवर्षी ही संख्या १३ हजार ४३० इतकी होती. यंदा ८५ ते ९० टक्य्यांच्या दरम्यान गुण मिळवणारे २३ हजार ४६० विद्यार्थी आहेत. गतवर्षी ही संख्या २१ हजार ५४१ इतकी होती. त्यामुळे यंदाही गुणफुगवटा वाढल्यामुळे इयत्ता अकरावीसाठी नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी चुरस रंगणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) किती टक्क्यांवर जाऊन पोहोचतात याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.

मुलींची बाजी

यंदाही मुंबई विभागातून मुलींनी बाजी मारली. मुलींच्या उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ही ९६.८८ टक्के इतकी आहे, तर मुलांच्या उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ९४.८५ टक्के आहे. मुंबई विभागातून एकूण १ लाख ७३ हजार ५४४ मुलांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १ लाख ७२ हजार ४८७ मुलांनी परीक्षा दिली आणि १ लाख ६३ हजार ६१९ मुले उत्तीर्ण झाली. तसेच मुंबई विभागातून एकूण १ लाख ६३ हजार ८३९ मुलींनी नोंदणी केली होती, त्यापैकी १ लाख ६३ हजार २२ मुलींनी परीक्षा दिली आणि १ लाख ५७ हजार ९४७ मुली उत्तीर्ण झाल्या.

मुंबई पश्चिम उपनगर अव्वल, तर पूर्व उपनगरचा निकाल सर्वात कमी

वर्ष – ठाणे रायगड – पालघर – मुंबई शहर – मुंबई पश्चिम उपनगर – मुंबई पूर्व उपनगर

२०२५ – ९५.५७ टक्के – ९६.२५ टक्के – ९५.३८ टक्के – ९६.७९ टक्के – ९६.९४ टक्के – ९४.९४ टक्के

२०२४ – ९५.५६ टक्के – ९६.७५ टक्के – ९६.०७ टक्के – ९६.१९ टक्के – ९६. १० टक्के – ९४.८८ टक्के

२०२३ – ९३.६३ टक्के – ९५.२८ टक्के – ९३.५५ टक्के – ९३.९५ टक्के – ९३.५५ टक्के – ९२.७६ टक्के

मुंबई विभागातील १ हजार ५७९ शाळांचा निकाल १०० टक्के

ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर, मुंबई पश्चिम उपनगर आणि मुंबई पूर्व उपनगरचा समावेश असलेल्या मुंबई विभागातील एकूण १ हजार ५७९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गतवर्षी मुंबई विभागातील १ हजार ५३३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता. त्यामुळे यंदा १०० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांच्या संख्येत किंचितशी वाढ झाली आहे. तर मुंबई विभागातील ८ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. विभागातील ५ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.