मुंबई : राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असताना, मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून राज्य सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

मुसळधार पावसाने भाजप महायुती सरकारचे सर्व दावे फोल ठरले आहेत. कालवे फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार तसेच मुंबई तुंबल्याने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या भ्रष्टाचाराची त्सुनामी बाहेर पडली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही मुंबईत जागोजागी पाणी साचले. सत्ताधारी पक्षाचा कथित विकास एका पावसाने उघडा पाडल्यानंतरही हे लोक आधीच्या सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. २५ वर्ष भाजप शिवसेनेबरोबर मुंबई महापालिकेत सत्तेत होती. एकनाथ शिंदे सातत्याने नगर विकास खात्याचे मंत्री आहेत. मग या काळात भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी काय केले, अशी विचारणा करत सरकारने आरोप -प्रत्यारोपाचा खेळ सोडून आत्मपरिक्षण करावे आणि जनतेला मदत करावी, असा सल्ला सपकाळ यांनी दिला.

विश्वास उटगी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उटगी यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष मोहन जोशी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.