मुंबई : राज्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी, महापुरामुळे १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टरचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा ३० जिल्ह्यांना फटका बसला आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित पंचनामे पूर्ण करून तत्काळ मदत देण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्यात पावसाचे थैमान चालू असून, गेल्या दोन महिन्यांत अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल ३० जिल्ह्यांतील १९५ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ महसूल मंडलांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दोन महिन्यांत सुमारे १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. अद्याप पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे. पण, शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, असेही भरणे म्हणाले.
मराठवाड्यात पावसाचा जोर जास्त आहे. नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुण्यात नुकसान झाले आहे. सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.
जिल्हानिहाय बाधित क्षेत्र
नांदेड – ७,२८,०४९ हेक्टर
वाशीम – २,०३,०९८ हेक्टर
यवतमाळ – ३,१८,८६० हेक्टर
धाराशिव – १,५७,६१० हेक्टर
अकोला – १,७७,४६६ हेक्टर
सोलापूर – ४७,२६६ हेक्टर
बुलढाणा – ८९, ७८२ हेक्टर