मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. काही भागात गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.मुंबईत मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर काही दिवसांतच पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. मुंबई शहर तसेच उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागात गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. नरिमन पॉइंट, दादर, वरळी, परळ, शीव, कुर्ला याचबरोबर घाटकोपर, पवई, भांडूप या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे.
दरम्यान, काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच या कालावधीत ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील. मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. पावसाचा सर्वाधिक जोर चर्चगेट, परळ, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, फोर्ट या परिसरात राहील. यामुळे पावसाचा अंदाज घेऊन गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
नवी मुंबईसह, रायगड जिल्ह्याला इशारा
मुंबईबरोबरच नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील काही तासांत या भागातही पावसाचा जोर वाढणार आहे. या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. नवी मुंबईतील नेरुळ, वाशी, बेलापूर या परिसरात शनिवारी सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे.
मोसमी वारे मंदावलेलेच
नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल आठवडाभरापासून मंदावली आहे. महाराष्ट्र , छत्तीसगड, ओडिशा ते पश्चिम बंगालपर्यंत मोसमी वारे दाखल झाल्यानंतर मोसमी वाऱ्यांनी प्रगती केलेली नाही. अरबी समुद्रातून २६ मेपासून तर बंगालच्या उपसागरातून २९ मेपासून मोसमी वारे पुढे सरकलेले नाहीत. मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, पूरी आणि पूर्व भारतातील बालूरघाटपर्यंत मोसमी वाऱ्यांची सीमा शनिवारीही कायम होती. मोसमी वारे अजूनही कमजोर असल्याने मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीस वाट पहावी लागणार आहे.