मुंबई : राज्यातील पाच ज्योतिर्लिंगाच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रथमच पाच सचिवांची नियुक्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार या अधिकाऱ्यांना संबंधित ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यांतील कामांचा नियमितपणे आढावा घेऊन, त्याबाबतचा अहवाल थेट मुख्यमंत्र्यांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांचा विकास करण्यासाठी आराखडे तयार करण्यात आले आहेत. या आराखड्यांची अंमलबजावणी वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने व्हावी याकरिता या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भीमाशंकर (जि.पुणे) ज्योतिर्लिंग विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे श्री. क्षेत्र घृष्णेश्वर (जि. छत्रपती संभाजीनगर)ची जबाबदारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांच्याकडे तर त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक)ची जबाबदारी वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांच्याकडे देण्यात आली आहे. औंढा नागनाथ (जि. हिंगोली) ची जबाबदारी वित्त विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागला यांच्याकडे, परळी वैजनाथ (जि. बीड) ची जबाबादारी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या पाच ज्योतिर्लिंगांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना उच्चाधिकारी समित्यांच्या बैठकांमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.

भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १४८ कोटी ३७ लाख रुपयांच्या सुमारे ११ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. घृष्णेश्वर तीर्थक्षेत्र विकास आराखडा १५६ कोटी ६३ लाख रुपयांचा आहे. त्र्यंबकेश्वर विकास आराखड्यातील २७५ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा १५ कोटी २१ लाख रुपयांचा आहे. परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील २८६ कोटी ६८ लाख रुपयांच्या ९२ कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विविध कामांना गती मिळावी, ही कामे दर्जेदार आणि गतीने व्हावीत, यासाठी संबंधित अधिकारी समन्वय साधणार आहेत. अशा पद्धतीने विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयीन स्तरावरून समन्वय, संनियंत्रणासाठी अधिकारी नियुक्तीचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला आहे.