मुंबई : राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात काही भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यात शुक्रवारनंतर मोसमी पाऊस सक्रिय होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर सर्वत्र जोरदार पाऊस पडेल असेही हवामान विभागाने सांगितले.
नैऋत्य मोसमी वारे मागील १२ दिवसांपासून एकाच जागेवर आहेत. सध्या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर राहील असा अंदाज हवामान विभगाने व्यक्त केला आहे. त्यानुसार अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. अनेक भागात सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील परभणी, बीड, धाराशिव, लातूर , नांदेड आणि हिंगोली भागातही हलक्या ते मध्यम सरींची तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, राज्यात शुक्रवारनंतर मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यानंतर राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच या कालावधीत पूर्व विदर्भ आणि कोकणाचा काही भाग सोडला तर राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. या अंदाजानुसार कोकण वगळता इतर भागात चांगला पाऊस पाऊस पडेल. दरम्यान, लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने जूनच्या सुरुवातीपासून उघडीप दिली आहे. काही भागात हलक्या सरींचा अंदाज आहे. मात्र मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
मोसमी वारे जैसे थे
नैऋत्य मासमी वाऱ्यांची वाटचाल एकाच जागी स्थिरावलेली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा ते पश्चिम बंगालपर्यंत मोसमी वारे दाखल झाल्यानंतर मोसमी वाऱ्यांनी प्रगती केलेली नाही. मुंबई, अहिल्यानगर, आलिदाबाद, पूरी आणि पूर्व भारतातील बालूरघाट पर्यंत मोसमी वाऱ्यांची सीमा सोमवारीही कायम होती.