मुंबई : मुंबईत मे महिन्याच्या अखेरीस पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहर भागात पाणी साचण्याची सुमारे ८० नवीन ठिकाणे आढळली असून या ठिकाणी पाणी का साचले याचा अभ्यास पर्जन्य जलवाहिन्या विभागातर्फे करण्यात येत आहे. मात्र काही तासातच पडलेला मुसळधार पाऊस आणि त्यात भरती अशा परिस्थितीमुळे पाणी साचल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला असून मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्यावर प्रशासन विचार करीत आहे. ताशी १२० मिमी पावसाचे पाणी वाहून नेण्याइतकी क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचा विचार आहे.

मुंबईत २६ मे रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहर भाग पाण्याखाली गेला. त्यामुळे पाणी साचणारी नवीनच ठिकाणे आढळून आली. ज्या भागात कधीही पाणी साचत नाही अशा भागातही पाणी साचले. त्यामुळे पालिका प्रशासनाने यंदा पाणी उपसणाऱ्या पंपाचीही संख्या वाढवली आहे. मात्र त्याचबरोबर काही दूरगामी प्रयत्नही करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे. दक्षिण मुंबईत २६ मे रोजी काही तासातच मुसळधार पाऊस पडला व त्याचवेळी समुद्राला भरती होती. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा निचरा होऊ न शकल्यामुळे पाणी साचल्याचे अनुमान प्रशासनाने काढले आहे.

मुंबई शहर चारही बाजूने समुद्राने वेढलेले आहे. बशीसारखा खोलगट आकार असल्यामुळे मुंबईत अनेक भाग सखल असून या भागात पावसाळ्यात पाणी साचते. पावसाचे पाणी वाहून समुद्रात जाते. मात्र अतिवृष्टी होत असताना समुद्राला भरती आली तर पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी मुंबईत असलेली पर्जन्य जलवाहिन्यांची यंत्रणा ब्रिटिशकालीन असून त्यांची क्षमता ताशी ५० मिमी पावसाचे पाणी वाहून नेण्याइतकी आहे. तसेच पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी ब्रिटिशकालीन पातमुखे ही समुद्र सपाटीपासून खाली आहेत. त्यामुळे भरतीच्या वेळी अतिवृष्टी झाल्यास पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाहीच, पण समुद्राचे पाणी शहरात शिरते. त्यामुळे मुंबईत पूरसदृश्य स्थिती निर्माण होते.

त्यावर उपाय म्हणून पालिकेने ब्रिमस्ट्रोवॅड अहवाल आणि चितळे समितीच्या शिफारशीनुसार पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याची, नाल्यांचे रुंदीकरण करण्याची कामे हाती घेण्यात आली होती. त्यामुळे मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता ताशी ६० मिमी पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याइतकी वाढवण्यात येत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून कमी वेळेत जास्त पाऊस पडत असल्याचे आढळून आल्यामुळे पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता ताशी १२० मिमी पावसाचे पाणी वाहून नेण्यास सक्षम असावी असे नियोजन करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे.

२६ मे रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यांची विद्यमान क्षमता अपुरी असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या १० वर्षांत मुंबईतील पावसाच्या तीव्रतेत मोठी वाढ झाली आहे. आता एका तासात १०० मिमी ते १८२ मिमी इतका पाऊस पडत आहे. गेल्या वर्षी १६ वेळा एका तासात १०० मिमी आणि २८ वेळा चार तासांत १८२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे नाल्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

मुंबईमध्ये एकूण सुमारे ३,८०० किमी लांबीचे नाल्यांचे जाळे आहे. यामध्ये २६१.५२ किमी लांबीचे मुख्य नाले (१.५ मीटरपेक्षा रुंद), ४११.५६ किमी लांबीचे लहान नाले (१.५ मीटरपेक्षा कमी रुंद), आर्च नाले आणि रस्त्याच्या कडेला असलेले नाले यांचा समावेश आहे.

कोणती नवीन ठिकाणे

मेट्रो सिनेमा, क्रॉफर्ड मार्केट, गोल मशीद, कफ परेड, चर्चगेट स्थानक, मंत्रालय जंक्शन, भेंडी बाजार, उमरखाडी, मशीद रेल्वे स्थानक, पायधुनी, दुसरा कुंभारवाडा, चिराबाजार, नानाचौक, दगडी चाळ, भारतमाता जंक्शन, वडाळा, काळाचौकी, जकारिया बंदर, परेल टीटी, माटुंगा कबुतर खाना, फाईव्ह गार्डन परिसर, वडाळा चर्च परिसर आदी.