मुंबई : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान होईल. आता सहा पदरी असलेला हा महामार्ग दहा पदरी करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी एकूण १४ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याआधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आठ पदरीकरण करण्याचा निर्णय घेत त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. आता आठऐवजी थेट दहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या दहा दिवसांत यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. एमएसआरडीसीने मुंबई – पुणे प्रवास अतिजलद करण्यासाठी ९४.५ किमी लांबीचा मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग बांधला. हा महामार्ग २००२ मध्ये पूर्णत: वाहतुकीसाठी खुला झाला आणि मुंबई ते पुणे अंतर केवळ अडीच तासात पार करणे शक्य होऊ लागले. सध्या या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सहा पदरी महामार्ग अपुरा पडू लागला आहे.
दररोज ६५ हजार वाहने
एमएसआरडीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार द्रुतगती महामार्गावरून दररोज ६५ हजार वाहने धावतात. गर्दीच्या वेळी ही संख्या एक लाखांवर जाते. भविष्यात वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता एमएसआरडीसीने सहा पदरी महामार्गाचे आठ पदीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. महामार्गाच्या दोन्ही बाजूने एक – एक मार्गिका वाढविण्याचा निर्णय घेत यासंबंधीचा अंदाजे ६०८० कोटी रुपयांचा प्रस्ताव फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला होता.मात्र आता नव्याने प्रस्ताव तयार करून महामार्गाचे आठऐवजी दहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
● एक-एक मार्गिका वाढविण्याचा आधी प्रस्ताव होता, पण आता दोन-दोन मार्गिका बांधण्यात येतील. यासाठी आवश्यक तेवढी जागा आहे.
● केवळ बोगद्यासाठी काही भूसंपादन करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. प्रकल्पाचा खर्च वसूल करण्यासाठी दोन पर्याय देण्यात येणार आहेत.
● तील एक पर्याय म्हणजे महामार्गावरील पथकर वसुलीची कालमर्यादा वाढवावी किंवा राज्य सरकारने अर्थसंकल्पीय तरतूद करून निधी उपलब्ध करून देण्याचा पर्याय आहे.
● या दोन्ही पर्यायांपैकी राज्य सरकार ज्याची निवड करेल त्यानुसार प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहे.