मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर तयारी करत असलेल्या युवासेना आणि मनसे विद्यार्थी सेनेला मोठा धक्का बसला आहे. यावरून युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं आहे. सिनेट निवडणुकीला सामोरं जायला मुख्यमंत्री घाबरतात, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला. आता मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनीही राज्यपालांना पत्र लिहित भाजपावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यपाल रमेश बैस यांना लिहलेल्या पत्र अमित ठाकरे म्हणाले, “मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक ‘पुढील आदेश’ येईपर्यंत विद्यापीठाने स्थगित करणं अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय आहे. ही निवडणूक लढवू इच्छिणारे नोंदणीकृत पदवीधर उमेदवार आज (शुक्रवार दि. १८ ऑगस्ट) सकाळी आपले उमेदवारी अर्ज विद्यापीठात दाखल करणार होते.”

हेही वाचा : रोहित पवारांनी अजित पवारांबाबत व्यक्त केली ‘ही’ भीती; म्हणाले, “भाजपाबरोबर गेलेल्या…”

“नेमक्या कोणत्या कारणाने निवडणूक रद्द करण्यात आली, हे…”

“मात्र, केवळ १२ तास आधी, काल रात्री ११ च्या सुमारास विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. सुनील भिरुड यांनी कालच्या शासन पत्राचा संदर्भ देऊन, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या कालच्याच बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ही निवडणूक स्थगित केल्याचं जाहीर केलं. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, नेमक्या कोणत्या कारणाने निवडणूक रद्द करण्यात आली, हे नमूद करण्याची पारदर्शकता दाखवणेही विद्यापीठाच्या कुलसचिवांना गरजेचे वाटले नाही,” असे अमित ठाकरेंनी म्हटलं.

“विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरत आहे?”

“आपल्याला माहितच आहे की, राजकीय- सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुशिक्षितांसाठी सिनेट निवडणूक ही व्यवस्थेत प्रवेश करण्याची पहिली पायरी असते. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसह इतरही अनेक विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी या निवडणुकीच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कारभाराबाबत तसंच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या गंभीर समस्यांबाबत काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करत होते. मात्र, या पदाधिका-यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या केवळ १२ तास अगोदर ही निवडणूक स्थगित करण्यात आल्यामुळे आता एक वेगळीच शंका उमेदवार तसंच मतदार म्हणून नोंदणी केलेल्या सुमारे ९५ हजार पदवीधरांच्या मनात उपस्थित झाली आहे – ‘विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरत आहे?'”, असा सवाल अमित ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांना…”

“दिल्लीतील सत्ताधीशांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्यांना…”

“राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आपल्या सोयीने सातत्याने पुढे ढकलणारे राज्याचे सत्ताधारी आता सिनेट निवडणुकाही वेळेवर होऊ देणार नसतील, तर त्याचा अर्थ दिल्लीतील सत्ताधीशांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्यांना लोकशाही गाडून हुकूमशाहीनेच कारभार हाकायचा आहे, हे स्पष्ट आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि मुंबई विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती म्हणून आपण या अतिसंवेदनशील प्रकरणात जातीने लक्ष घालावे आणि सिनेट निवडणूक नेमक्या कोणत्या कारणाने ‘रातोरात’ रद्द करण्यात आली हे स्पष्ट करावे, हीच आग्रहाची मागणी. सिनेट निवडणूक रद्द करण्यासाठी आज ‘पहाटे’चा मुहूर्त निश्चित केला नाही, यासाठी कुलपतींचे मन:पूर्वक आभार!”, असा टोलाही अमित ठाकरेंनी लगावला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university senate election cancelled aaditya thackeray attacks eknath shinde and amit thackeray letter governor ssa