मुंबई : लोकसभा निकालाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे होईल आणि राज्यात सत्ताबदल अटळ असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केला. मोठा भाऊ, छोटा भाऊ, असा वाद टाळून निवडून येण्याची क्षमता या आधारे जागावटप करण्याचा निर्धारही करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वेळी काँग्रेसचे विधिमंजळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. लोकसभेपेक्षा अधिक ताकदीने लढून विधानसभेत लोकसभेपेक्षा चांगले यश संपादन करू, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. शेतकऱ्यांसह सर्वच समाज घटकांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकविला आहे. धार्मिक ध्रुवीकरणाचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही, असे मतही चव्हाण यांनी व्यक्त केले. लोकसभेत सर्वाधिक १३ खासदार काँग्रेसचे निवडून आले असले तरी विधानसभेच्या जागावाटपात मोठा भाऊ, छोटा भाऊ असा वाद आम्ही घालणार नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘रोड शो’ झाला त्या घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले. मोदींच्या राज्यात जेथे जेथे जाहीर सभा झाल्या तेथे महायुतीचा पराभव झाला याकडे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष वेधले. भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग करण्यात आला. शेतकरी वर्ग भाजपच्या धोरणांवर नाराज होता. शेतकऱ्यांच्या नाराजीचा भाजपला फटका बसला आहे. कांद्याने भाजपला रडविले, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा >>> “नाटयगृहांवरील कर, देखभालीची जबाबदारी सरकारची”, शरद पवार यांचे मत

मुंबई व राज्यात ‘एम’ घटकामुळे शिवसेना ठाकरे गटाला यश मिळाल्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘एम’ म्हणजे मराठीबरोबरच आम्हाला हिंदू, मुस्लीम, ख्रिाश्चनांसह सर्व भाषकांची मते मिळाली आहेत. लोकशाही वाचविण्याकरिता सर्वधर्मीय व भाषकांनी महाविकास आघाडीला भरभरून मते दिली. हजारो लोकांच्या रक्तातून मिळालेली मुंबई भाजपला लुटू देणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. कांद्याने भाजपला रडविले, असे बोलले जाते. पण कांद्यामुळे की मित्रपक्षांमुळे भाजपच्या डोळ्यात पाणी आले, असा सवाल करीत ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगाविला. देशात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या मागणीचा शरद पवार यांनी पुनरुच्चार केला.

तुमचे खरे कथानक होते का?

‘आम्ही खोटे कथानक रचून निवडून आलो, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपची अन्य मंडळी नैराश्यातून करीत आहेत. इंडिया आघाडी सत्तेत आल्यास मंगळसूत्र काढून नेतील, तुमची संपत्ती जास्त मुले होणाऱ्यांना वाटतील, नकली सेना, प्रत्येकाला नोकरी व घर देणार, उद्याोगधंदे येतील हे तुमचे खरे कथानक होते का, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून शनिवारी केला.

भाजप अजिंक्य नाही उद्धव ठाकरे

●लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप अजिंक्य पक्ष असल्याचे चित्र उभे केले गेले. पण अजिंक्य असल्याचा भाजपचा फोलपणा उघड झाला. भाजपला राज्यात अपयश आले पण देशातही बहुमत मिळू शकले नाही.

●देशात मोदी किंवा भाजप सरकार नव्हे तर आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

●लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाने लढाई संपलेली नाही तर खरी लढाई आता सुरू झाली आहे.

●लोकसभेप्रमाणेच राज्यातील जनता विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला जबरदस्त दणका देईल, असा दावा ठाकरे यांनी केला.

भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग करण्यात आला. शेतकरी वर्ग भाजपच्या धोरणांवर नाराज होता. शेतकऱ्यांच्या नाराजीचा भाजपला फटका बसला आहे. कांद्याने भाजपला रडविले. -शरद पवार, ज्येष्ठ नेते

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mva leaders joint press conference amid rift rumours ahead of mlc elections zws