कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १३५ जागांसह बहुमत मिळालं आहे. तर, भाजपाचा ६६ जागांसह दारूण पराभव झाला आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला सुनावलं होतं. कर्नाटकातील विजय हा काँग्रेसचे यश असून, आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही, असं समजणाऱ्या प्रवृत्तीचा पराभव आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.
राज ठाकरे यांच्या विधानावर मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांनी खोचक टीका केली होती. “घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. जर कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव असेल, तर मग जालंधरमध्ये आम आदमी पक्षाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव का झाला? उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही भाजपाला घवघवीत यश मिळालं. मग तिथे ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव नव्हता का? यावर राज ठाकरे बोलतील का?”, असा सवाल आशीष शेलार यांनी विचारला. याला राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा : VIDEO : कर्नाटक निकालावरून राज ठाकरेंचे भाजपाला खडेबोल, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आमच्या…”
“विरोधकांच्या गोष्टी मान्य करायला हव्यात”
“ज्यांची पोहच नसते, त्यांना या गोष्टी सुचू शकतात. ही कोण लोक आहेत मुळात… निवडणुका असल्यावर नाक्यावर सभा घेणारी ही लोक आहेत. विरोधकांच्या गोष्टी मान्य करायला हव्यात. ही गोष्ट फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात. त्यामुळे त्यांच्या पक्षातील लोकांनाही या गोष्टी कळल्या पाहिजेत,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी शेलारांचा समाचार घेतला आहे.
“काही गोष्टी मोठ्या मनाने मान्य करायला पाहिजेत”
“‘भारत जोडो’ यात्रेला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा परिणाम कर्नाटकात झाला. म्हणून काही गोष्टी मोठ्या मनाने मान्य करायला पाहिजेत. एखाद्या पराभवातून काहीजणांना बोध घ्यायचा नसेल, तर तसेच वागा,” असे राज ठाकरेंनी म्हटलं.
“ही छोटी माणसं आहेत”
‘राज ठाकरे हे केवळ स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी वक्तव्य करतात’, असंही आशीष शेलार म्हणाले. याबद्दल विचारल्यावर राज ठाकरेंनी सांगितलं, “यांचं अस्तित्व मोदींवर आहे. यांना कोण ओळखतं? ही छोटी माणसं आहेत”.