मुंबई : सध्याच्या निवडणूक प्रक्रियेवर काही शंका असल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या, मंगळवारी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा शिष्टमंडळात समावेश असेल. महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर राज ठाकरे सहभागी होणे ही महत्त्वाचे मानले जाते.

सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी होण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण दिले आहे. लोकशाही बळकट व्हावी व निवडणूक यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा हा भेटीचा मुख्य हेतू आहे. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याने आपण सहभागी होऊन सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रतिष्ठा वाढवावी, असे राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायतींच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील. या निवडणुकांच्या यंत्रणा आणि प्रक्रियेवर कोणताही संशय राहू नये, निवडणुका निष्पक्षपातीपणे, पारदर्शक व संविधानाचे पूर्ण पालन व्हावे ही राजकीय पक्षांची भूमिका आहे, असे खासदार राऊत यांनी सांगितले. यावर निवडणूक आयोगाचे लक्ष वेधण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेट घेणार आहे.

शरद पवार अनेक वर्षानंतर मंत्रालयात

राज्याचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले शरद पवार हे मंत्रालयात कधी येत नाहीत. मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर त्यांनी तेथे भेट दिली होती. यामुळे पवार हे अनेक वर्षांनंतर मंत्रालयात येणार आहेत. दुसरीकडे, सर्वपक्षीय शिष्टमंडळात जाण्यावरून काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. काही जणांच्या मते मनसेबरोबर पक्षाच्या नेत्यांनी जाऊ नये, अशी भूमिका पक्षाच्या बैठकीत मांडण्यात आली.

हरकती, सूचनांसाठी मुदतवाढ

राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर आता १३ ऑक्टोबरऐवजी १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २८ ऑक्टोबरऐवजी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.