मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यासाठी ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील आणि वांद्रे शासकीय वसाहतीमधील रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. पण या दोन्ही ठिकाणच्या रहिवाशांनी बहिष्कार मागे घेत सोमवारी मतदानाचा हक्क बजावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. दरम्यान, वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पात एका घरामागे एक वाहनतळाची जागा देण्यात आली आहे. मात्र ही तरतूद ना. म. जोशी मार्ग बीडीडीसाठी लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील रहिवासी नाराज आहेत. ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांनाही एका घरामागे एक वाहनतळाची जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र या मागणीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे नाराजी वाढली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता या निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती ना. म. जोशी बीडीडी चाळ पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी दिली.

हेही वाचा…मतदानाचा हक्क बजावणे झाले शक्य, मतदानाच्या दिवशी नवमतदारांना मिळाले मतदार ओळखपत्र

दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत या दोघांनी त्यांची ही मागणी राज्य सरकारसमोर मांडून त्यावर निर्णय घेण्यास लावू, असे आश्वासन दिले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानावरील बहिष्कार स्थगित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयानुसार सोमवारी ना. म. जोशी मार्गसह नायगाव आणि वरळीतील बीडीडी चाळींतील रहिवाशांनी मतदानाचा हक्क बजावला. या तिन्ही ठिकाणचे मोठ्या संख्येने रहिवासी संक्रमण शिबिरात स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे संक्रमक शिबिरातील रहिवाशांना मतदार केंद्रावर नेण्यासाठी उमेदवारांनी टॅक्सीची सोय केली होती.

वांद्रे शासकीय वसाहतीच्या पुनर्विकासाअंतर्गत गेली अनेक वर्षे शासकीय सेवेत असणाऱ्या आणि येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना माफक दरात घरे द्यावेत अशी मागणी मागील २० वर्षांपासून कर्मचाऱ्यांची – अधिकारी करीत आहेत. गव्हर्नमेन्ट क्वाटर्स रेसिडेंट असोसिएशनच्या माध्यमातून या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र या मागणीवर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे या वसाहतीतील कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मतदानावावर बहिष्कार टाकल्याचा निर्णय जाहीर केला होता. पण आता मात्र हा निर्णय स्थगित करण्यात आल्याची माहिती असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा…मुंबई : लांब रांगा, मतदान यंत्रात बिघाड, वीजपुरवठा खंडित; विविध कारणांमुळे मतदान प्रक्रियेत अडथळा

मतदानावर बहिष्कार टाकल्याच्या बातमीनंतर आमदार ॲड आशिष शेलार यांनी रहिवाशांबरोबर चर्चा करून त्यांची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली. तर वसाहतीतील एका शिष्टमंडळाने नुकतीच उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. या भेटीत मिळालेल्या आश्वासनानंतर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला. त्यामुळे वांद्रे वसाहतीतील रहिवाशांनी सोमवारी महात्मा गांधी शाळा, न्यू इंग्लिश स्कुल, पीडब्ल्यूडी मैदान, कार्डिनल स्कुलमध्ये मोठ्या संख्येने मतदान केले. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आमच्या मागणीवर ठोस निर्णय झाला नाही, तर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा असोसिएशनने घेतला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residents of mumbai s nm joshi marg bdd chawl and bandra government colony withdraw poll boycott vote amidst redevelopment demands mumbai print news psg