उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेत (बीएमसी) भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने १२०० कोटी रुपयांच्या बीएमसीतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती केली. याबाबत विचारलं असता शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. ते मंगळवारी (२० जून) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, “शिंदे-फडणवीस सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) नेमली असेल तर चांगली गोष्ट आहे. एसआयटी नेमण्यासाठी माझ्याकडे खूप विषय आहेत. अब्दुल सत्तारांचा घोटाळा, दादा भुसेंचा भ्रष्टाचार, राहुल कुल यांचा मुद्दा, शंभुराजे देसाईंचा एक विषय समोर येत आहे, राधाकृष्ण विखे पाटलांचा मोठा घोटाळा समोर येत आहे. त्यामुळे सरकारने केवळ एक एसआयटी बनवू नये. आणखी एसआयटी नेमाव्यात.”

“…तर मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर दररोज एक एसआयटी नेमावी लागेल”

“शिंदे फडणवीस सरकारला त्यांच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर दररोज एक एसआयटी नेमावी लागेल. दादा भुसेंचा १७० कोटी रुपयांचा घोटाळा आहे. त्याबाबत दोन दिवसात माझी ईडीत तक्रार दाखल होईल. राहुल कुल यांचा ५०० कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगचं प्रकरण आहे. त्या प्रकरणातही माझी ईडीकडे तक्रार दाखल होत आहे. राधाकृष्ण विखेंबाबतही मी माहिती जाहीर करणार आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

हेही वाचा : “महाराष्ट्रात गद्दारी व्हावी यासाठी मोदींनीही प्रयत्न केले, त्यामुळे आता…”; संजय राऊतांचा हल्लाबोल

“…तर आम्ही बीएमसीतील एसआयटीचंही स्वागत करू”

“अब्दुल सत्तार तर सर्वांना लुटत आहेत. सत्तारांबाबत येणाऱ्या काळात काय होतं हे सर्वांना दिसेलच. या सर्व प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वेगळ्या एसआयटीची स्थापना केली, तर आम्ही बीएमसीतील एसआयटीचंही स्वागत करू,” असंही संजय राऊतांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut comment on sit to investigate allegations of corruption in bmc pbs