मुंबई : भाजपमध्ये हल्ली हौशे, गौशे आणि नवशे खूप आले आहेत. त्यांचा भाजपशी आणि हिंदुत्वाशी संबंध नाही. त्यामुळे आयातांना शिवसेना-भाजप युतीचे महत्त्व कळणार नाही. पण जुन्या नेत्यांपैकी चंद्रकांत पाटील हे शिवसेना-भाजप युतीचे समर्थक होते. कारण आम्ही २५ वर्षे एकत्र काम केले आहे, असे सांगतानाच सध्या आम्ही ‘थांबा आणि वाट पाहा’च्या भूमिकेत आहोत, असे सांगत शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी गुगली टाकली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपचे आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यानिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या भेटीदरम्यान शिवसेना-भाजपची पुन्हा युती झाल्यास तो माझ्यासाठी सुवर्णक्षण असेल असे पाटील यांनी ठाकरेंना म्हटल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकमेकांपासून दूर गेलेले हे दोन्ही पक्ष जवळ येणार का, यावर संजय राऊत यांनी भाष्य केले.

देशाच्या राजकारणात शिवसेना-भाजप युतीचा सुवर्णकाळ होता. आमच्यामुळे देशाच्या राजकारणात आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा दिसत आहेत. शिवसेनेबरोबर आल्यानेच भाजपचा अमृतकाळ सुरू झाला, असे सांगतानाच राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्या ज्या भावना आहेत, तशा त्या पक्षामध्ये अनेकांच्या भावना आहेत, असे ते म्हणाले.

फडणवीसांनी दावा फेटाळला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संजय राऊत यांचा दावा फेटाळला. अनौपचारिक भेटींचा राजकीय अर्थ लावू नये, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. विवाह सोहळ्यात भेट झाली म्हणून युती झाली किंवा पक्ष जवळ आले, असा विचार करण्याइतके कोणीही भोळे नाही, असेही फडणवीस म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut statement strengthens alliance talks mumbai news amy