केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे शाब्दिक युद्ध काही थांबायला तयार नाही. आज नेहमीप्रमाणे सकाळी माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्याबद्दल अश्लाघ्य शब्द वापरला आहे. तसेच कृपाशंकर सिंह यांनी संजय राऊत यांना मकर संक्रांतीनिमित्त गोड बोलण्याचे आवाहन केले होते. त्यावर राऊत म्हणाले की, गोड बोलण्यासाठी मला स्वतःचा पक्ष सोडून भाजपमध्ये जाण्याची आवश्यकता वाटत नाही. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौरा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची ईडी चौकशी आणि विधानपरिषदेच्या निवडणुकींवर आपल्या शैलीत रोखठोक भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आधी गुजरातने पळवलेले उद्योग परत आणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसच्या दौऱ्यावर गेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र दौऱ्याला गेले नाहीत. यावरुन प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, दावोसवरुन काय येईल, हे आम्हाला माहीत नाही. पण तुमच्या नाकासमोरुन जे उद्योग पळवून नेले. ते आधी परत आणा. मिहान आणि महाराष्ट्राच्या इतर भागातून एअरबस, वेदांता फॉक्सकॉन असे दोन लाख कोटींच्या वरची गुंतवणूक गुजरात आणि इतर राज्यात गेली आहे. ती आधी घेऊन आलात तर दावोसला जाण्यात अर्थ आहे.

“दावोसमध्ये जगभरातून राज्यकर्ते येत असतात. करार करुन फक्त आकडे सांगितले जातात. अमूक लाख कोटी, तमूक लाख कोटींचे करार झाले. पण प्रत्यक्षात दावोसमध्ये जेवढे करार झाले, त्यापैकी नक्की किती कंपन्या देशात आल्या, हे कुणीही सिद्ध करु शकलेले नाही. पण आमच्या डोळ्यासमोरुन एअरबस, वेदांता फॉक्सकॉन, ड्रग्स पार्क असे अनेक प्रकल्प राज्यात आले होते, येत होते. पण ते कुणीतरी खेचून घेऊन गेले. त्यामुळे दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा”, असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला.

हे वाचा >> अवघ्या २१ अब्जाधीशांकडे ७० कोटी भारतीयांपेक्षा जास्त संपत्ती आहे; ऑक्सफॅमचा अहवाल

तर मिठी नदीतही प्रेतं तरंगताना दिसली असती

करोना काळातील निर्णयांची चौकशी होणार असल्याबाबतही राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, “केंद्रीय तपास यंत्रणा आणि सत्ता हातात असल्यामुळे खोटी प्रकरणे निर्माण करुन बदनामीची मोहीम राबविली जात आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात उत्तर प्रदेशप्रमाणे गंगेत प्रेतं तरंगली नाहीत. प्रत्येकाला आम्ही उपचार देऊ शकलो, प्राण वाचवू शकलो. हे उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचे यश होते. मुंबई महानगरपालिका, प्रशासन यांच्या सर्वांचे हे यश होते. नाहीतर मुंबईच्या मिठी नदीतही प्रेतं तरंगताना दिसली असती. ज्या कायद्यानुसार तातडीने निर्णय घेण्याची गरज होती, त्यानुसारच निर्णय घेण्यात आले आहेत. मी खात्रीशीर सांगतो, अत्यंत पारदर्शक असे व्यवहार झाले होते”

डॉक्टर आणि नर्सेस पळून जात असताना त्यांची मनधरणी करुन त्यांच्याकडून काम करुन घेणे कठीण काम होते. उत्तर प्रदेशच्या नद्यातून प्रेतं वाहून जाताना जगाने पाहिले. ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी काम केले, त्यावर भाजपाने त्यांचे आभार मानले पाहीजेत, असेही राऊत म्हणाले. तसेच सरकार पूर्ण न्याययंत्रणा ताब्यात घेऊ पाहत आहे, असे जेष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी सांगितले. याआधी सरकारने सर्व सरकारी यंत्रणा ताब्यात घेतल्या आहेत. आता न्याय व्यवस्थेवर हातोडा घालण्याचे काम सरकारकडून होत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut used the wrong word for bjp leader narayan rane kvg