लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : गेली ३० वर्षे मुंबई पदवीधर मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व असून यावेळी निवडणूक आयोगाने १२ हजार मतदार वगळण्याची लबाडी केली आहे. पण या मतदारसंघावर शिवसेनाच झेंडा रोवेल, असा विश्वास शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. भाजपकडून लोकशाही व राज्यघटनेला असलेला धोका संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येक निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे, असा इशारा त्यांनी उपस्थित पदवीधर मतदार शिवसैनिकांना दिला.

वांद्रे- कुर्ला संकुलातील ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन क्लब’मध्ये शनिवारी मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार अॅड. अनिल परब यांच्या ‘वचननामा’चे प्रकाशन झाले. त्यावेळी ठाकरे बोलत होते. शिक्षणतज्ज्ञ व माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर व्यासपीठावर होते.

हेही वाचा >>>उद्धव ठाकरे अडचणीत? निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर शहानिशा सुरू

नीट आणि नेट परीक्षांच्या पेपरफुटीचा संदर्भ देत आदित्य ठाकरे म्हणाले, नीट गोंधळाचे धागेदोरे केंद्रीय मंत्र्यापर्यंत पोचले आहेत. शिक्षणाचा हा गोंधळ किती दिवस चालणार आहे? आपल्याकडे शिक्षण हक्क कायदा आहे, पण गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मोठी उणीव आहे. हे सर्व बदलायचे आहे. त्यासाठी अॅड. परब यांच्यासारखे लोक विधान परिषदेत पाठवा, असे ठाकरे म्हणाले. आजचे शिक्षण मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात राहिलेले नाही. खाजगी शिकवणीवाल्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. देशाचा बेरोजगारीचा दर ८ टक्के असला तरी पदवीधरांच्या बेरोजगारीचा दर ४३ टक्के आहे. हे देशातील ६०० विद्यापीठांचे व आपल्या शिक्षणव्यवस्थेचे पूर्णपणे अपयश आहे, अशी टीका भालचंद्र मुणगेकर यांनी केली.

वचननाम्यामध्ये काय?

व्हिसा – पारपत्र प्रक्रिया, परदेशी शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश यासंदर्भात मदत कक्ष, दरवर्षी शैक्षणिक- रोजगार मेळावे, मुंबईतील मराठी माणसाला हक्काच्या घरांची खात्री मिळण्यासाठी खाजगी सदस्य विधेयक, गट वैद्याकीय विमा, विधान परिषद आमदार फेलोशिप, रक्तपेढ्यांमधून मोफत रक्त, उपनगरात बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमीची शाखा, पेपरफुटीच्या तपासासाठी दक्षता कक्षाची निर्मिती आदी आश्वासने अॅड. अनिल परब यांनी वचननामामध्ये दिलेली आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena will win even if 12 thousand voters are excluded aditya thackeray belief about mumbai graduate constituency amy