मुंबई: भाजप ही चेटकीण असून दुसऱ्यांचे पक्ष खाण्याचा रोग या पक्षाला जडला आहे. आधी त्यांनी विरोधी पक्ष खाल्ले आता मित्रपक्षांना खायला निघाला आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्रपक्षांना स्वबळावर लढायला लावून भाजप शिंदेसेना व अजित पवारांच्या पक्षाचा काटा काढणार हे लक्षात आल्यानेच माझा पक्ष व मला वाचवा, अशी मनधरणी करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत गेले, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
सत्तेतील ‘गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन’ सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे असे नाही. भाजपा, शिंदेसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच प्रचंड वाद आहेत, तिन्ही पक्षात कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याने हे सरकार पाच वर्षे कसे चालणार हा कुतूहलाचा प्रश्न आहे. आता शिंदेसेनेलाच गिळंकृत करण्याचा डाव भाजपने आखला असून स्वतःला वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत गेले आहेत, पण भाजपचा मित्रपक्षांबद्दलचा आतापर्यंतचा अनुभव पाहता ते शिंदेना कितपत दाद देतील हे पहावे लागेल, असे सपकाळ म्हणाले.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या आरोपावर बोलताना सरकार त्यांच्याच पक्षाचे आहे, मातृभूमी फाऊंडेशनची उच्चस्तरीय चौकशी करा किंवा एसआयटी बसवा आणि त्यात काही तथ्य असेल तर कठोर शिक्षा करा पण ते कांगावा करत असतील तर सार्वजनिक जीवनातून निवृत व्हावे असे आव्हान सपकाळ यांनी दिले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असे जाहीर आश्वासन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले आहे. मध्यतंरी अजित पवार यांनी आम्ही असे म्हटले नव्हते असे म्हणाताच त्यांचा जाहिरनामाच त्यांना दाखवला होता तरिही ते पुन्हा कांगावा करत आहेत. खोटं बोल पण रेटून बोल, ही भाजपाची शैली अजित पवारांनी उचलली असून ‘वाण नाही पण गुण तरी लागला’, असेच म्हणावे लागले असा टोला सपकाळ यांनी लगावला.
