मुंबई : बदलापुरातील घटनेनंतर सरकारने खणखणीत भूमिका घ्यायला हवी होती, पण तेच या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केला. बदलापूरप्रमाणेच ठिकठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. बहीण सुरक्षित नाही आणि कंसमामा राख्या बांधत फिरतो आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापुरात गेल्या आठवड्यात दोन शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या राज्य बंदला उच्च न्यायालयाने मनाई केल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने आज राज्यभर काळ्या फिती लावून मूक आंदोलन करण्यात आले. शिवसेनेच्या वतीने दादर येथे सेनाभवनसमोरील चौकात ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भरपावसात आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी बदलापूर घटनेतील आरोपीला फाशी देण्याची मागणी करतानाच महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडीचा आजचा बंद कडकडीत झाला असता, याची जाणीव झाल्यानेच त्यांचे चेलेचपाटे न्यायालयात पाठवले आणि महाराष्ट्र बंदमध्ये अडथळा निर्माण केला. संकटांचा सामना करण्याची हिंमत नाही. संकटांचा बंदोबस्त करण्याची ताकद नाही. असे हे निर्ढावलेले सरकार असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

हेही वाचा >>> काँग्रेस – नॅशनल कॉन्फरन्स आघाडी, तरी काश्मीर खोऱ्यात मैत्रीपूर्ण लढती?

महिला वर्गासाठी महाविकास आघाडीने दिलेला आवाज न्यायालयापर्यंत पोहोचविण्यासाठी जागे व्हा, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच महाविकास आघाडीच्या काळात आणलेल्या शक्ती कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी द्यावी, अशी मागणीही केली.

मुंबईत मूक आंदोलन

मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यभर विविध ठिकाणी तोंडावर काळी पट्टी बांधून एका तासाचे निषेध आंदोलन केले. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी धारावी व नागपाडा जंक्शन येथे, आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वात परळ येथे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

भर पावसात शरद पवार, सुप्रिया सुळे आंदोलनात

पुणे : बदलापूरमधील शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी महाविकास आघाडीने शनिवारी मूक मोर्चा काढला. या मोर्चामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भर पावसात सहभागी होऊन निषेध केला. ‘बदलापूर येथे घडलेली घटना दुर्दैवी होती. या घटनेचे विरोधक राजकारण करत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे, याचे दु:ख वाटते,’ अशी टीका पवार यांनी केली.

बदलापूरसारख्या घटनांवर राजकारण नको – बावनकुळे

मुंबई : बदलापूर घटनेतील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच महिला अत्याचार प्रकरणात महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुटप्पी भूमिका उघड करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी राज्यात धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी बदलापूरातील दुर्देवी घटना मानवतेला काळीमा फासणारी असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी राज्यभर जागर जाणिवेचा अभियानही राबविण्यात आले. केवळ बदलापूरच नव्हे, जिथे कुठे अशा घटना घडतात त्या राजकारणाचा विषय कदापि होऊ शकत नाही असे त्यांनी नमूद केले असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत नमूद केले.

चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आदी नेत्यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी झालेल्या या आंदोलनात भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. विधानपरिषद गट नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात महाड मधील चवदार तळे येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी . बदलापूर येथे झालेली दुर्दैवी घटना मानवतेला काळीमा फासणारी असून अशा घटना होऊ नयेत म्हणून भाजपातर्फे महाराष्ट्रभर ‘जागर जाणिवेचा’ हे अभियान राबविण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ubt chief uddhav thackeray slam maharashtra government over badlapur incident zws