मुंबई : महानगरपालिकेने अनधिकृत फलकांविरोधातील मोहीम हाती घेतली असली तरीही मुंबईतील अनधिकृत फलकबाजी पूर्णपणे बंद झालेली नाही. मानखुर्द भागातील अनेक परिसरांमध्ये वारंवार धार्मिक, राजकीय, तसेच सामाजिक अनधिकृत फलक लावले जात आहेत. महापालिकेतर्फे अनेक वेळा फलक काढले जातात. मात्र, पुन्हा शहरभर फलक झळकतात. मानखुर्द रेल्वे स्थानकानजीक शीव पनवेल महामार्गाच्या पुलावर आता चक्क लग्नाचे फलक लावण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या नियमांना बगल देत ठाकरे गटाच्या अणुशक्तीनगरच्या उपविभागप्रमुखाने ही फलकबाजी केली आहे.

महानगरपालिका प्रशासनामार्फत मुंबई अधिकाधिक सुंदर, स्वच्छ ठेवण्यासाठी विविध उपक्रम व उपाययोजना केल्या जातात. मात्र, विविध कारणांमुळे शहराचे विद्रुपीकरण सुरूच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत पोस्टर, होर्डिंग, फलकबाजीच्या आव्हानाला पालिकेला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. मात्र, अद्यापही ही समस्या संपलेली नाही. शहरात राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृत फलक लावले जातात. पक्षांचे कार्यकर्ते सातत्याने फलक लावण्याची अक्षरशः कारणे शोधत असतात. राजकीय नेत्यांच्या शुभेच्छा, सण – उत्सव, नेते तसेच अन्य कार्यकर्त्यांचा, पदाधिकऱ्यांचा वाढदिवस, राजकीय पदांवरील निवडीबाबत शुभेच्छा, पक्षांचे विविध उपक्रम आदींची जाहिरात करताना नाक्यानाक्यावर, चौकाचौकात, गल्लीबोळात अनधिकृत फलक लावले जातात. हे फलक लावल्यानंतर महिनोमहिने जैसे थे असतात. मानखुर्द भागात देखील वारंवार अनधिकृत फलक लावल्याचे निदर्शनास येते. राजकीय ओळख वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांकडून सातत्याने फलकबाजी केली जाते. मानखुर्द रेल्वे, स्थानक परिसर व नजीकच्या शीव पनवेल महामार्गाच्या पुल कायमच राजकीय तसेच सामाजिक, धार्मिक फलकांनी वेढलेला असतो. अशातच आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या नियमांना बगल देत थेट घरगुती लग्नाच्या आमंत्रणाचा भलामोठा फलक लावला आहे. फलकावर दिलेली लग्नाची तारीख उलटून सहा दिवस उलटले तरीही फलक जैसे थे आहे. त्याबाजूलाच भंडारा आणि शोकसभेचे फलक लागले आहेत.

महानगरपालिका वेळोवेळी अनधिकृत फलकांविरोधातील मोहीम हाती घेते. त्याअंतर्गत मानखुर्दमध्येही अनधिकृत फलकांवर कारवाई केली जाते. नव्याने लावण्यात आलेल्या फलकांवर पुन्हा कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.