नितीन पखाले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ : समृद्घी महामार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात यवतमाळच्या दोन तरुणांसह २५ जणांचा बळी गेल्यानंतर ट्रॅव्हल्स प्रवास नको रे बाबा अशी प्रतिक्रिया उमटत आहे. बस समृद्धी महामार्गावरून न नेता ती जुन्याच नागपूर-औरंगाबाद-पुणे या मार्गाने चालवा अशी मागणी प्रवशांमधून पुढे आली आहे. याला यवतमाळच्या अनेक ट्रॅव्हल्स संचालकांनी दुजोरा दिला.

विदर्भातून दररोज १०० च्या वर खासगी ट्रॅव्हल्स पुण्या, मुंबईकडे धावतात. यवतमाळ येथूनही पुण्यासाठी सर्वाधिक खासगी बसेस जातात. यवतमाळमधील चिंतामणी ट्रॅव्हल्सचा ऑक्टोबर २०२२ मुंबईकडे जाताना नाशिकनजीक अपघात होऊन १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर आता गेल्या शुक्रवारी यवतमाळच्याच विदर्भ ट्रॅव्हल्सचा समृद्घी महामार्गावर अपघात होऊन लागलेल्या आगीत २५ प्रवासी होरपळून ठार झाले. त्याचा परिणाम ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर झाला आहे. यवतमाळहुन पुण्याला जाण्यासाठी ट्रॅव्हल्सशिवाय सोयीचा पर्याय नसल्याने अनेकांना इच्छा नसतानाही हा प्रवास करावा लागतो. मात्र शुक्रवारी या अपघातानंतर अनेकांनी ट्रॅव्हल्सचे बुकिंग रद्द केले. आता तर प्रवाशांनी समृद्धी महामार्गाचाच धसका घेतला आहे. ट्रॅव्हल्स जुन्याच मार्गाने नेत असाल तर बुकिंग करतो, असे प्रवासी ट्रॅव्हल्स कार्यालयात बोलतात. याला चिंतामणी ट्रॅव्हल्सचे संचालक गुड्डू जयस्वाल यांनीही दुजोरा दिला.

हेही वाचा >>>“एक शरद पवार म्हणजे शंभर अजित पवार तयार करणारी फॅक्ट्री”, प्रदेश सरचिटणीसांसह शंभर पदाधिकाऱ्यांचा ताफा मुंबईकडे

यवतमाळच्या दोन खासगी बसेस अपघातानंतर पेटल्याने त्याचा वाईट परिणाम ट्रॅव्हल्स व्यवसायावर झाल्याचे जयस्वाल यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. आता प्रवासी जोखिम स्विकारण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे अनेक ट्रॅव्हल्स कंपन्यांनी आपला मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यवतमाळहुन पुण्याला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कारंजा येथील समृद्धी महामार्गावर चढतात. औरंगाबादपर्यन्त २०० किलोमीटरचे हे अंतर अवघ्या अडीच ते तीन तासांत कापले जाते. रस्ता मोकळा असल्याने वेग वाढतो आणि अपघात झाल्यास वाचण्याची शक्यता कमी असते, असे या अपघातानंतर निदर्शनास आल्याने प्रवाशीच आता समृद्धी महामार्गाने प्रवास करण्यास नकार देत आहेत. पहिले अपघात रोखण्यासाठी उपाय योजना करा, नंतरच या महामार्गावरून खासगी बसेस चालवाव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

हेही वाचा >>>वाशीम: पाऊस लांबल्याने १ लाख १७ हजार हेक्टरवरील पेरण्या धोक्यात; दुबार पेरणीचे संकट

दरणे यांच्या मालकीची विदर्भ ट्रॅव्हल्स बंद

समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यानंतर वादात सापडलेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीने आपली प्रवासी सेवा बंद ठेवली आहे. या ट्रॅव्हल्सचे मालक, संचालक भास्कर दरणे यांनी आपल्या मालकीच्या बसची प्रवासी सेवा काही दिवस बंद केल्याची माहिती दिली. तर याच ट्रॅव्हल्स कंपनीचे दुसरे संचालक सुधीर निमकर (दारव्हा) यांच्या मालकीच्या विदर्भ ट्रॅव्हल्सची प्रवासी सेवा मात्र सुरू आहे. या अपघातानंतरही स्थानिक उपप्रादेशिक परिवहन विभाग मात्र अजूनही ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानीविरोधात कारवाईसाठी पुढे न आल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 people including two youths of yavatmal were killed in an accident on samridghi highway nrp 78 amy