यवतमाळ : जिल्ह्यात २६ एप्रिल रोजी लोकसभेकरिता मतदान होत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यवतमाळ आणि वाशीम या दोन्ही जिल्ह्यांत प्रचाराचा शुभारंभ झाला. पहिल्याच दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विविध अनुभवांना सामोरे जावे लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यावर त्या स्थानिक उमेदवार नसल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होत आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे स्वत:ला कुणबी असल्याचे सांगून मतदारांची फसवणूक करीत असल्याचा थेट आरोप महायुती उमेदवाराच्या प्रचारसभेत मंचावरून झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे विकासाच्या चर्चेवर निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कुठलेचे मुद्दे नाहीत. दोन्ही उमेदवार प्रथमच थेट लोकसभेच्या रिंगणात उतरल्याने यापूर्वी त्यांनी मतदारसंघासाठी काय केले, याचा कोणताच लेखाजोखा दोन्ही उमदेवारांकडे नाही.

हेही वाचा…आरोपीला जामीन दिल्यामुळे बलात्कार पीडितेने न्यायालयात घातला गोंधळ

महाविकास आघाडीचे संजय देशमुख हे दोनदा दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार होते. मात्र, त्या काळात त्यांनी मतदारसंघात कोणतेही ठोस काम केले नसल्याचे नागरिक सांगतात. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचे सामाजिक आणि सहकार क्षेत्रात योगदान आहे. मात्र मतदारसंघ म्हणून ठोस काम कोणते सांगावे, हा पेच त्यांच्या समर्थकांपुढेही आहे.

या दोन्ही उमेदवारांचे समर्थक प्रचारासाठी गावागावात फिरत असताना त्यांना नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ नेर तालुक्यात गेलेल्या स्वयंसेवकांना नागरिकांनी, ‘जिल्ह्याबाहेरचा उमेदवार आमच्यासाठी काय करणार,’ असा थेट प्रश्न विचारला. त्या यवतमाळच्या लेक आहे, त्यांचा सन्मान करूच, पण आम्ही बसून आहो तो बेंचसुद्धा संजय देशमुख यांनी दिला, राजश्री पाटील यांनी आमच्या गावाला काय दिले,’ असे म्हणत प्रचारकांना गप्प केले. दुसरीकडे, महायुतीच्या दिग्रस येथील सभेत बोलताना महायुतीचे समर्थक अबू पाटील यांनी, ‘कुणब्यांना संपविणारा लबाड व्यक्ती म्हणजे संजय देशमुख,’ असा थेट वार केला. आमदार असताना त्यांनी समाजाला सर्वाधिक त्रास दिला, अशी खंत बोलून दाखविली. लोकांच्या मतांसाठी ते कुणबी असल्याचे खोटे सांगून फसवित असल्याचा आरोपही पाटील यांनी देशमुख यांच्यावर केला आहे. या दोन्ही प्रसंगांच्या चित्रफिती जिल्ह्यात प्रचंड प्रसारित झाल्या असून, यावरून नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत.

हेही वाचा…अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा; चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; ५५ घरांची पडझड

‘स्वत:चे काम दाखवा’

महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जनतेकडून मिळत असलेल्या सहानुभूतीच्या लाटेवर, तर महायुतीच्या उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अबकी बार…’ च्या घोषणेवर स्वार असल्याचे चित्र आहे. मात्र, उमेदवारांनी इतर कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा ते स्वत: काय आहेत, हे मतदारांसमक्ष सिद्ध करावे. एकमेकांचे वैयक्तिक बाभाडे काढण्यापेक्षा विकासाच्या मुद्यावर बोलावे. शेतकरी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बोलावे, त्यांच्या समस्या कशा सोडविणार हे सांगावे, उमेदवारांनी भविष्यातील विकासाचे ‘व्हीजन डॉक्युमेंट’ सादर करावे, अशी अपेक्षा सामान्य मतदार व्यक्त करीत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidates in yavatmal lok sabha seat accused of lack of local connection and performance record nrp 78 psg