चंद्रपूर : पोलीस शिपाई पदाच्या १३७ पदांसाठी बीएचएमएस डॉक्टरपासून तर एमबीए, बीटेक, एमटेक, बीई, एमसीए, बीफार्म, एमएससी, बीएससी, बीसीए, एमएसडब्ल्यू अशा उच्च शिक्षित उमेदवारांनीही अर्ज केले आहे. यानिमित्ताने बेरोजगारीचे संकट किती गडद होत चालले आहे याचे वास्तव पोलीस भरती प्रक्रियेतून समोर आले आहे. दरम्यान या सर्वांची शारीरिक क्षमता चाचणी परिक्षा सोमवारपासून सुरू होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या १३७ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अतिशय पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबविली जाईल असे आश्वासन दिले आहे. १३७ पदांसाठी २२ हजार ५८३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामध्ये १३ हजार ४४३ पुरुष तर ६ हजार ३१५ महिला व दोन तृतीय पंथींचा समावेश आहे. तर बॅण्डमनच्या ९ पदासाठी २ हजार १७६ पुरुष व ६४६ महिला, एक तृतीयपंथी उमेदवार आहे.

हेही वाचा – वर्धा : विद्यापीठाची सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ते आता थेट फोर्ब्सच्या यादीत मानांकन, जाणून घ्या अ‍ॅड. क्षितिजा यांचा प्रवास

विशेष म्हणजे, १३७ पदांसाठीच्या या भरती प्रक्रियेत बीएचएमएस झालेल्या एका उमेदवाराने अर्ज केला आहे. उच्च शिक्षित उमेदवारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. विशेषत्वाने बॅचलर ऑफ इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलेल्या २०५ उमेदवारांनी पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केला आहे. त्या पाठोपाठ बी.टेक पदवी प्राप्त ४५ विद्यार्थी आहेत. एम.टेक २, एमबीए अर्थात व्यवस्थापन शाखेत पदवीप्राप्त ७१ विद्यार्थ्यांनी या पदासाठी अर्ज केला आहे. एमसीए १२, बी. फार्मसी १२, एमलिब ८, एमपीएड ८, बीबीए ३१, बीकॉम ८८१, एमकॉम २३७, एमएसस्सी १७५, बीएसस्सी ९७७, बीसीए २७, एमए ७३३, बीए ३१०७, एमएसडब्ल्यू ४, बीएसस्सी ॲग्री ६१ व बीएसडब्ल्यू २९ उमेदवारांनी अर्ज केला आहे.

हेही वाचा – मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर अवमानाचा खटला; सहा आठवड्यांत जबाब नोंदवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

यामध्ये बीएडचे शिक्षण घेतलेल्या अनेकांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या संख्येत उच्चशिक्षत पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झाल्याने देशातील बेरोजगारीचे संकट या माध्यमातून समोर आले आहे. औद्योगिक जिल्हा असला तरी या जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच या जिल्ह्यातील बहुसंख्य तरुण चंद्रपूर सोडून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या मेट्रो सिटीकडे वळले आहेत. स्थानिक पातळीवर उच्चशिक्षितांना नोकरीची संधी नाही. त्यामुळेच पोलीस भरतीत इतक्या मोठ्या संख्येने उच्चशिक्षित सहभागी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे अनेकांना शासकीय नोकरीच हवी आहे. त्यामुळेही अनेक उच्चशिक्षत इंजिनिअर झालो असलो तरी पोलीस भरतीत नशिब आजमावत आहेत. उच्चशिक्षतही पोलीस भरतीकडे वळल्याने बारावी, बीए, एमए, बीकॉम पदवी घेतलेल्या सामान्य उमेदवारांची चांगलीच अडचण झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur crisis of unemployment is dark doctor engineer mba mtech candidates in police recruitment rsj 74 ssb