यवतमाळ : देशातील निवडणूक पारदर्शकपणे घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे. मात्र अलीकडच्या काळात निवडणूक आयोग हा मनुवाद्यांच्या आणि भाजपच्या इशाऱ्यांवर चालत आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त काँग्रेसच्या वतीने यवतमाळ येथील संविधान चौकात निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१९ ते २०२४ या पाच वर्षात पाच लाख मतदार वाढले. मात्र लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ५० लाख मतदार कसे वाढले? विधानसभा निवडणुकीत सायंकाळी ५ वाजल्यानंतर ७६ लाख मतदान कसे झाले? याचे कोणतेही उत्तर निवडणूक आयोगाकडे नाही. निवडणूक आयोग भाजप कार्यकर्ता असल्यासारखे वागत असल्याने या आयोगाची स्वायत्तताच नष्ट झाली, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्रात निवडणूक आयोगाच्या आशीर्वादावर आलेले भाजप महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे आयोगाच्या कृत्यांविरोधात, लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे, असे ते म्हणाले.

भाजप केवळ मतांसाठी हिंदू-मुस्लीम, मंदिर-मशीद, भारत-पाकिस्तान, वोट जिहाद करीत आहे. हिंदूंना मूर्ख बनवून मत घ्यायचे हा भाजपचा एकमेव धंदा आहे. मुख्यमंत्री दाओसला जाऊन आलेत; मात्र झालेले करार हे महाराष्ट्रातील कंपन्यांसोबतचे आहेत. महाराष्ट्रातील चांगले उद्योग गुजरातला जात आहेत. त्यावेळेस हे गप्प का बसतात, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी केला.

या प्रसंगी वडेट्टीवार यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही टीका केली. सोमय्या हे नाटकातील सोंगाड्या आहेत. आवश्यक त्या ठिकाणी त्यांना पुढे केले जाते. काम झाले की त्यांचे कपडे काढून टाकले जात असल्याने त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही. ज्यांच्यावर सोमय्यांनी आरोप केले ते सगळे मंत्रीमंडळात मंत्री असून सरकारमध्ये सहभागी आहेत. यांनी आरोप करायचे आणि भाजपने त्यांना उचलून घ्यायचे, असे धाेरण असल्याने अशा बेईमान लोकांना महत्त्व देण्याची गरज नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर, ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रदेशाध्यपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ठरविण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठीचा आहे. प्रदेशाध्यक्ष कधी द्यायचा? कोणाला करायचे? हे पक्षश्रेष्ठी ठरवित असतात. याचे उत्तर माझ्याकडे नाही. प्रदेशाध्यक्षपदासाठी आपण इच्छुक आहात का, असे विचारले असता पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. त्यांनी लढ म्हटले की, आम्ही लढायला तयार आहोत, असे उत्तर वडेट्टीवार यांनी दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mla vijay wadettiwar accused election commission of acting on bjp s warnings nrp 78 sud 02